bandhara.jpg
bandhara.jpg

सलग दुसऱ्या वर्षी रब्बी फुलण्याचा आशावाद; परतीच्या पावसाची अपेक्षा कायम

नाशिक : (येवला) सलग तीन वर्ष अल्प पावसामुळे रब्बीच्या पिकांवर पाणी सोडावे लागलेल्या येवला या दुष्काळी तालुक्याला परतीच्या पावसाने मागील वर्षी साथ दिली होती. चालू वर्षी तर खरीपही वेळोवेळी आलेल्या पावसाने जोमात आहे. त्यातच पावसाची अजूनही साथ मिळत असल्याने रब्बीचा आशावादही जागा झाला आहे. शहरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन ११३ टक्के पाऊस नोंदला आहे. काही मंडळांत अल्प पाऊस असल्याने परतीच्या पावसाकडून मोठ्या अपेक्षा असून, रब्बी फुलणार हे स्पष्ट झाले आहे.

परतीच्या पावसाकडून टक्केवारी पूर्तीची अपेक्षा 
 
तालुक्यात खरिपात जोरदार पाऊस झाला तरच रब्बीची पिके निघतात. तालुक्याच्या उत्तर-पूर्व अवर्षणपट्ट्यात पावसावर अवलंबून असल्याने या भागाला अनेकदा खरिपावर अवलंबून रहावे लागते अन् दोन-तीन वर्षांतून एकदाच रब्बी नशिबी असतो. पश्चिम भागातील ५२ गावे पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असल्याने या भागात रब्बी पीक निघते. मात्र, संपूर्ण तालुक्याचा विचार केल्यास जोरदार पावसाशिवाय रब्बी शक्य नसतो. २०१६ ते २०१८ पर्यंत अर्ध्या तालुक्याला रब्बीवर पाणी सोडण्याची वेळ पावसाअभावी आली होती. गेल्या वर्षी मात्र कृषी विभागाने पेरणीचा लक्ष्यांक शून्य ठेवला असताना सरतेशेवटी जोरदार पावसाने तालुकाभर काही प्रमाणात रब्बीची पिके निघाली. यंदा तर सुरवातीपासूनच वेळोवेळी पाऊस अपेक्षापूर्ती करतो आहे. 

रब्बीखाली २० हजारांवर हेक्टर क्षेत्र गुंतवले जाऊ शकेल... 

मंगळवारी व बुधवारीही शहराच्या विविध भागात तासभर पाऊस पडला. पावसाचे दिवस बाकी असल्याने आणि सध्या स्थिती समाधानकारक असल्याने यंदा रब्बी निघणार, हे स्पष्ट झाले आहे. गव्हासह हरभरा, रांगडे व आगाद उन्हाळ कांदेही निघण्याची आशा आहे. शासकीय नोंदीत तालुक्यातील १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत. तथापि, शंभरवर गावांत रब्बीची पेरणी होते. पण, पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावात हंगाम निघण्याची शाश्वती असते. इतर गावे मात्र पावसामुळे बांधावर असतात. तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यातही सर्वच शेतकरी आगाद पेरणी करतात, म्हणून जी काय होते ती पेरणी मार्गी लागते. या वेळी रब्बीखाली २० हजारांवर हेक्टर क्षेत्र गुंतवले जाऊ शकेल. 

चार मंडळांना जोरदार पावसाची प्रतीक्षा 

तालुक्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ४५३ मिलिमीटर असून, आतापर्यंत ५१३ मिलिमीटर म्हणजेच ११३ टक्के पाऊस येवला शहरात पडला आहे. अर्थात, हे शहरातील पर्जन्यमापकाचे आकडे आहेत. मंडळनिहाय पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी शासकीय दप्तरी मात्र शहरातलाच पाऊस नोंदला जात आहे. सर्वाधिक येवला मंडळात ५११, तर अंदरसूल मंडळात ४४७ मिलिमीटर व सर्वाधिक कमी पाऊस नगरसूल येथे ३०२, पाटोद्यात ४०८, सावरगावमध्ये ३६०, जळगाव नेऊरला ३६६ मिलिमीटर पावसाची नोंद आजपर्यंत झाली आहे. सर्व मंडळांची सरासरी गृहीत धरल्यास तालुक्यात ६७ टक्के पाऊस पडल्याचे दिसते. त्यामुळे जळगाव, नगरसूल, सावरगाव, राजापूर भागात परतीच्या पावसाकडून अद्याप अपेक्षा आहेत. 

पावसाने सुरवातीपासून तालुक्‍यात रब्बीचा आशावाद जागविला आहे. त्यामुळे रब्बीतील गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल. सोबतच रांगडे व उन्हाळ कांद्याचे क्षेत्रदेखील वाढणार असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी रोपे घेण्याची तयारीही चालविली आहे. काही भागाला पुढील पिकासाठी अद्याप पावसाची गरज आहे. - साईनाथ कालेकर, कृषिसेवक 

रब्बीच्या पेरणीचे आकडे (हेक्टरमध्ये) 

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - २०१८ ची पेरणी - २०१९ ची पेरणी 
ज्वारी - १,३६० - ३४२ - ५११ 
गहू - ८,०२३ - ६,३१४ - १,१७८ 
मका - ६४ - ७ - १ 
हरभरा - ४,१०३ - ५,७४१ - १,३५१ 
कांदा – ६,००० - ४,५०० – ३,००० 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com