कांदा गडगडला! साठवणुकीवर निर्बंधाने भाव कोसळले; लिलाव ठप्प

onion-2-6410.jpg
onion-2-6410.jpg

नाशिक : (लासलगाव)केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणताच शनिवारी (ता. २४) लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत लाल कांदा दोन हजार ३०० रुपये, तर उन्हाळ कांदा एक हजार १०० रुपयांनी कोसळला. 

कांदाभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल

शनिवारी उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार ८००, सरासरी पाच हजार ३००, तर कमीत कमी एक हजार ५०० रुपये भाव मिळाला. लाल कांद्याला जास्तीत जास्त चार हजार २०१, सरासरी तीन हजार ७०१, तर कमीत कमी एक हजार ४०१ रुपये भाव मिळाला. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी, आयातीसाठी प्रोत्साहन, कांदा साठवणुकीवर मर्यादा या कारणांमुळे कांदाभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, भाव कोसळताच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांनी आक्रमक होत शेतकऱ्यांना एकत्रित करीत लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडत सर्व निर्बंध मागे घ्यावेत; अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

सर्वसामान्यांच्या डोळ्यांत कांदा पाणी आणणार

केंद्राने अवघ्या २५ टनापर्यंत कांद्याला साठवणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. देशातील बऱ्याच भागात परतीचा जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले, तर यंदा दिवाळीत कांद्याच्या दरात अधिकची वाढ होऊ शकते. काही दिवसांपासून मेट्रो शहरात १०० ते १२० रुपये प्रतिकिलोने किरकोळ कांदा विकला जात आहे. 

आयातीला परवानगी दिल्याने भाव पडण्याची शक्यता 

गेल्या काही दिवसांत मेट्रो भागात कांद्याचा भाव २० रुपयांवरून १२० रुपयांच्या जवळपास पोचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला. तसेच आयातीवरच्या कांद्याला लागणारी इन्स्पेक्शन शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे. दुसऱ्या देशातून आयातीला परवानगी दिल्यामुळे भाव पडण्याची शक्यता आहे. मग कांदा जीवनावश्यक यादीतून वगळून केंद्र सरकारनं नेमकं काय साध्य केलं? असा प्रश्न उत्पादकांकडून विचारला जात आहे. भाव वाढले, की आधी निर्यातबंदी केली. त्यातूनही भाव वाढले, तर आयातीला परवानगी दिली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या कांद्याचं करायचं तरी काय? असा सवाल उत्पादक करीत आहेत. 

कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत ‘जैसे थे’ राहणार? 

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नवीन पीक फेब्रुवारीत येईल, तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे हॉटेल आणि ढाबे सुरू करणे. त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून, कांदा महाग होत आहे. 

केंद्र सरकारने शुक्रवारी व्यापारी वर्गाच्या साठवून करून टाकलेल्या निर्बंध धोरणामुळे आज माझे मोठे नुकसान झाले. त्याच दिवशी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत माझा कांदा सहा हजार ९०० दराने विकला गेला. तोच कांदा शनिवारी त्याच बाजार समितीत पाच हजार १२५ दराने विकला गेला. केंद्राच्या चुकीच्या निर्णयाचा फटका मला बसला. दोन हजार रुपयांचा मला फटका बसला. केंद्र सरकार मदत करणे तर दूरच; पण आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. - दत्तात्रय जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, येवला  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com