खरं की काय?...टोमॅटोवरही आला म्हणे विषाणू...वाचा काय आहे सत्य

tomatoes.jpg
tomatoes.jpg

नाशिक : कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू हा टोमॅटोवर आला आहे...त्यामुळे टोमॅटो घेत असाल तर सावधान...अशा प्रकारचे बोलले जात आहे. टोमॅटो पिकावर आढळून येत असलेल्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मानवी आजाराशी जोडले जात आहे. नाशिकमध्ये चुकीच्या अफवा पसरू लागल्याने चिकनसारखीच परिस्थिती अफवांमुळे टोमॅटोवर येण्याची भीती निर्माण झाली आहे. अफवा टोमॅटो उत्पादकांच्या मुळावर येतील हे नाकारुन चालणार नाही. सविस्तर प्रकार असा की...

प्रादुर्भाव झालेले क्षेत्र आढळून आलेले नाही

जिल्ह्यात सध्या 700 हेक्‍टरच्यावर टोमॅटो लागवडी आहेत. सध्या लॉकडाउन परिस्थिती, त्यात बाजारभाव नसल्याने शेतकरी नाराज आहेत. अनेकांनी बांधणीवर आलेल्या टोमॅटो लागवडी बांधल्या नाहीत, तर काहींनी फळे तोडण्याविना त्या सोडून दिल्याची परिस्थिती काही ठिकाणी आहे. एकंदरीत बाजार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र राज्यात दुसरीकडे टोमॅटो पट्ट्यात सध्या असणारा कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही), ग्राउंडनट बड नेक्रोसिस व्हायरस (जीएनबीव्ही) व टोमॅटो क्‍लोरोसिस या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे का, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून क्षेत्रीय पातळीवरून तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत माहिती घेतली जात आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कुठलीही लेखी तक्रार व प्रादुर्भाव झालेले क्षेत्र आढळून आलेले नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

अफवांशी संबंध नसल्याचा दावा
 
जिल्ह्यात कळवण, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, निफाड तालुक्‍यात उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवडी आहेत. ज्या लागवडी आहेत, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त नाही. मात्र, टोमॅटोवर ठिपक्‍याचा विषाणूजन्य प्रादुर्भाव नगण्य प्रमाणावर असतो. तो दिसून येतो, त्याचा सध्याच्या अफवांशी संबंध नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. 

अन्यथा अफवा टोमॅटो उत्पादकांच्या मुळावर येतील 

टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. मात्र तांत्रिक तपशील न घेता टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांची चुकीची चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात त्याबाबत प्रादुर्भावाची स्थिती आढळून आलेली नाही. मात्र नाशिकमध्ये चुकीच्या अफवा पसरू लागल्याने चिकनसारखीच परिस्थिती अफवांमुळे टोमॅटोवर येण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र याबाबत अफवा न पसरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे समाजमाध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित होणार याची पोलिस सायबर सेलने दक्षता घ्यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करत आहेत. 

काय आहे जिल्ह्यातील स्थिती 

लागवडीखालील क्षेत्र : 700 ते 750 हेक्‍टर 
प्रादुर्भाव : नाही 
प्राप्त तक्रारी : शून्य 

तिरंगा या विषाणूजन्य रोगाचा हवामानबदलामुळे काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो. मात्र ज्या चर्चा सुरू आहेत त्यात तथ्य नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी आकार, रंग आणि नैसर्गिकपणा न टिकता वेडावाकडा आकार आला होता. मात्र त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत नसल्याने उगाच अफवा नसाव्यात. राज्यात ज्या विषाणूजन्य रोगांच्या चर्चा सुरू आहेत, मात्र नाशिकमध्ये याबाबत अजून तक्रारी प्राप्त नाहीत. - कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, नाशिक 

बाजारात टोमॅटोच्या दरातील स्थिती अवघडच आहे. त्यातच गेल्या 15 दिवसांत अफवा पसरल्याने दरात मोठा फटका बसत आहे. व्यापारी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. लिलाव झाल्यानंतर वांधा काढतात. पोल्ट्रीच्या बाबतीत जी अवस्था अफवांमुळे झाली, ती टोमॅटोच्या बाबतीत होऊ नये. प्रतिक्रेट 120 रुपयांपर्यंत दर असताना 50 ते 60 रुपयांनी घसरण झाली आहे. - गोविंद पगार, टोमॅटो उत्पादक, कळवण, जि. नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com