"महामारीच्या काळात केवळ शेतीच होती सुरू..समाजाने बळीराजाच्या घामाला न्याय द्यावा" - कृषिमंत्री

dada-bhuse farmers.jpg
dada-bhuse farmers.jpg

नाशिक : कोरोनाच्या काळात कोणतीही अडचण भासू नये, म्हणून शेतकऱ्याने स्वतःच्या जीवावर उदार होत पोटाला चटके देत घाम गाळला. महामारीच्या धास्तीने सर्वकाही बंद असताना शेती मात्र सुरूच होती. याचे श्रेय बळीराजालाच असून, त्याच्याप्रति आदर व्यक्त करत त्याच्या घामाला न्याय देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता.1) केले. राज्याचे तब्बल अकरा वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळलेले हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी होते. यानिमित्त राज्याच्या कृषी विभागातर्फे 1 ते 7 जुलैदरम्यान कृषी सप्ताह होतो. त्याचा प्रारंभ बुधवारी मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत ओणे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे कृषी संजीवनी सप्ताहाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाने झाला. 

भुसे काय म्हणाले... 
- राज्यातील शेतकरी चिंतामुक्त, कर्जमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न 
- बळीराजासाठीच्या शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी 
- शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवणार नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान 
- शेतकरी सक्षमीकरणासाठी उत्पादकता, गुणवत्ता व उत्पन्नवाढीची त्रिसूत्री 
- यूरियाचा तुटवडा जाणवू नये, म्हणून 50 हजार टनाचा बफर स्टॉक 
- कर्जासाठी पुन्हा पुन्हा अर्ज नको म्हणून विशेष प्रणाली 

कृषिमंत्री दादा भुसे : प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार
या वेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्र्यांनी राज्यातील शेतकरी चिंतामुक्त व्हावा, हा सरकारचा मुख्य उद्देश असून, त्यासाठी शासकीय योजना काटेकोरपणे राबवून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील चित्र बदलण्याचा संकल्प केला. यासाठी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी शेडनेट हाउस, मळणी, फळबाग लागवड, पीक प्रात्यक्षिके आदींची कृषिमंत्र्यांनी पाहणी केली. यानंतर यांत्रिकरणाच्या सहाय्याने भातपीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग घेतला. 

शेतीशाळांमधील महिलांचा सहभाग वाढावा 
राज्यात होणाऱ्या शेतीशाळांमध्ये सध्या पंचवीस टक्के महिलांच्या शेतीशाळा घेतल्या जाव्यात, अशा सूचना मंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत. कारण एका महिलेला शिकवले, तर संपूर्ण कुटुंबाला शिकवल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. म्हणून शेतीशाळांमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. 

सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, गोकुळ वाघ, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com