
कंपनीची ड्यूटी संपल्यानंतर दुचाकीवरून दोघेही मित्र हे त्यांच्या तिसऱ्या मित्राला घरी सोडण्यासाठी गेले होते, मित्राला घरी सोडून मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघे जण घरी परतत असतानाच त्यांच्यावर काळाने छडप घातली अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं..
नाशिक : कंपनीची ड्यूटी संपल्यानंतर दुचाकीवरून दोघेही मित्र हे त्यांच्या तिसऱ्या मित्राला घरी सोडण्यासाठी गेले होते, मित्राला घरी सोडून मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघे जण घरी परतत असतानाच त्यांच्यावर काळाने छडप घातली अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं..
जानेवारीत होतं रोहितचं लग्न
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रोहित संजय पिंगळे (वय २७) हा दुचाकीवर मागच्या सीटवर बसला होता. औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची येथील गोदावरी लॉन्ससमोर अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने त्यांना जोरात धडक दिली. धडकेनंतर वाहनाच्या मागच्या चाकाखाली येऊन रोहित याचे जागीच निधन झाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रोहितचा जानेवारी येत्या महिन्यात विवाह निश्चित झाला होता. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या अतुल अशोक शिंदे (वय २६) याचे रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी निधन झाले. लहानपणापासून मैत्री असलेले रोहित व अतुल दोघेही टाकळी रोडवरील इंद्रायणी सोसायटी व परिसरात वास्तव्याला होते.
हेही वाचा > भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन मित्रांच्या सोबतच झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे व पिंगळे कुटुंबियांनी तरुण मुले गमावल्याने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच अपघाताची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला