शंभर वर्षांचं गुहेतलं "त्यांचं" वास्तव्य..कठीण वनवास..अन् गुहेतून गृहप्रवेश!

guha.jpg
guha.jpg

नाशिक : ना घरपण, ना विजेचा दिवा, ना शिक्षण, ना डांबरी रस्ता...फक्त आणि फक्त गुहेतलं जीवन.. असं जीवन जगणाऱ्या कुटुंबाचा गावाशी संबंधही नाही..आश्चर्य वाटलं ना..पण हे खरचं आहे.. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पळसुंदे (फोफसंडी वाडी) येथील सोमनाथ घमाजी वळे (वय ६०) कुटुंबाचं हा वर्षानुवर्षांचा गुहेतला वनवास अखेर संपुष्टात आला असून, त्यांना पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून घरकुल मिळाले आहे.

गुहेतलं त्यांचं शंभर वर्षांचं वास्तव्य...ही दंतकथा नाही...तर वास्तव

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही काही कुटुंबे अश्मयुगीन मानवाप्रमाणे डोंगरदऱ्यांतील गुहांतच वास्तव्याला आहेत ही बाब कुणीही मान्य करणार नाही. मात्र, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर आणि इगतपुरी या चार तालुक्यांच्या मधोमध वसलेल्या पळसुंदे (फोफसंडी वाडी) येथील सोमनाथ वळे यांचे कुटुंब शंभर वर्षांपासून या गावालगत उत्तरेकडील डोंगरात ६०० फूट उंचीवरील एका गुहेतच वास्तव्याला होते.

शंभर वर्षांनंतर गुहेतून गृहप्रवेश

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून योगायोगाने शासकीय यंत्रणेतील अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, ग्रामसेवक अविनाश मंडलिक या वळे कुटुंबापर्यंत पोहोचले आणि या कुटुंबाचा गुहेतील शतकोत्तरी वास्तव्याचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी कायमचा संपुष्टात आला. वळे कुटुंबाला पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून पळसुंदे गावातील गावठ्यात हक्काचे घर मिळाल्याने या कुटुंबाचा शंभर वर्षांनंतर गुहेतून गृहप्रवेश झाला आहे. वळे कुटुंबाचा हा घराचा वनवास संपविण्यासाठी पळसुंदे गावच्या सरपंच स्वाती उमरे यांनीदेखील पुढाकार घेतला.

गावाशी संबंधही अभावानेच.​..वळे कुटुंबाची कहाणी

सोमनाथ वळे यांचे आजोबा, वडील आणि आता त्यांच्यासह त्यांच्या नातवापर्यंतच्या पिढ्यांचे वास्तव्य या गुहेतच होते. ब्रिटिशांच्या जंगल कायद्याने त्यांचे गुरे चराईचे हक्काचे जंगल अभयारण्यात समाविष्ट झाल्याने वळे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीच भूमिहीन झाले. घरासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने त्यांच्या आधीच्या पिढ्यांचे वास्तव्य तब्बल सहाशे फूट उंचीवरील डोंगरकपारीतील गुहेतच होते. पशुपालन हा मुख्य व्यवसाय. जोडीला जंगलातून मध, डिंक, कंदमुळे जमा करायचे. शिक्षण तर नाहीच..दळणवळणाच्या सुविधा तर कोसो दूर. मोबाइल, इंटरनेट हे शब्द तर दूरच. गावाशी संबंधही अभावानेच. मात्र, २०१८-१९ या वर्षी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वळे कुटुंबापर्यंत पोहोचली आणि या कुटुंबाला स्वप्नातील घर मिळाले. वळे कुटुंबाकडे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रेच नव्हती. मात्र, शासकीय यंत्रणेकडे इच्छाशक्ती असल्यास अशक्य ते शक्य होते, याचे वळे कुटुंबाचा गुहेतून गृहप्रवेश हे चपखल उदाहरण ठरले आहे.

हेही वाचा >

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com