विरोध डावलून 'इथं' त्यांची मनमानी सुरूच...इतका अट्टाहास का?...रंगतेय चर्चा!

tent.jpg
tent.jpg

नाशिक : (मालेगाव) शहरात शेकडो शाळा, महाविद्यालयांच्या इमारती असताना आणि महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांचा विरोध असतानाही जुन्या महामार्गावरील रिलायबल मैदानावर कोविड रुग्णांसाठी पाचशे बेडच्या टेंट निवारा केंद्राचे काम सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

टेंट निवार केंद्राचे काम सुरू 

महापौर ताहेरा शेख, कॉंग्रेसचे गटनेते रशीद शेख, महागठबंधन आघाडीचे मुश्‍तकीम डिग्निटी, शिवसेनेचे सखाराम घोडके आदींसह सर्वपक्षीय नगरसेवकांचा या कामाला विरोध आहे. याबाबत "सकाळ'ने सर्वप्रथम आवाज उठविला होता. स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि काळ्या मातीची जमीन असल्याने येथे टेंट योग्य होणार नाही. हा पैसा वाया जाईल, याबाबत "सकाळ'ने वृत्त दिले होते. गेल्या 17 मेस महापौर शेख यांनीही विरोध असल्याबाबत उपायुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले होते. तरीही हे काम सुरू झाल्याने श्री. डिग्निटी यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना याविरोधात निवेदन दिले. विशेष म्हणजे, 14 मेस सायंकाळी अवघ्या दहा मिनिटांच्या जोरदार पावसाने या मैदानावर चिखल झाला होता.

प्रशासनाने खुलासा करणे आवश्‍यक

निवारा केंद्रासाठी ही जागा योग्य नसताना आणि शहरात शेकडो शाळांच्या इमारती असताना हा अट्टाहास का, याचा मनपा प्रशासनाने खुलासा करणे आवश्‍यक आहे. त्यातच टेंट व बेड पुरविणाऱ्या कंपनीचे गुजरात कनेक्‍शन पुढे आल्याने संतापात भर पडली आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महागठबंधन आघाडीने केली आहे. दरम्यान, या मैदानाऐवजी मदरसा मिल्लत ही पर्यायी जागा टेंटसाठी सुचविण्यात आली होती. तसेच, खुल्या जागेऐवजी मनपा रुग्णालय, हज केंद्रातच सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. हा निधी कायमस्वरूपी कामात येईल, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. 

खर्चाची चौकशी होणे गरजेचे 

आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल यांच्या मालेगाव बचाव समितीनेही ओपन टेंटला विरोध केला आहे. शहरातूनही चौफेर टीका होऊ लागली आहे. सत्तारूढ कॉंग्रेसनेही ओपन टेंट व मैदानावरील निवार केंद्रास विरोध असल्याचे निवेदन दिले. तरीही मनपा प्रशासनाने निधी खर्च केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी म्हाळदे घरकुल, जीवन हॉस्पिटल येथील कोरोना केंद्र बंद पडल्यानंतरही प्रशासन त्यातून काही बोध घेत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. म्हाळदे केंद्र बंद होताच अठरा पंखे व 60 एलईडी असा 56 हजारांचा ऐवज चोरीला गेला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खर्च झालेल्या निधीची चौकशी होणे गरजेचे आहे. 

रिलायबल मैदानाची संपूर्ण जमीन काळी व कसदर आहे. हलकासा पाऊस झाला तरीही येथे चिखलाचे साम्राज्य होईल. रुग्णवाहिका, घंटागाडी व कुठलेही वाहन जाणे शक्‍य नाही. याची जाणीव असताना प्रशासन पैसा का पाण्यात घालतेय, हा प्रश्‍नच आहे. - सखाराम घोडके, नगरसेवक, शिवसेना 

मनपातील सत्तारुढ व विरोधी पक्षांचाही विरोध असताना हा वायफळ खर्च कशासाठी? शहरातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्याऐवजी मनपाचे वाडिया रुग्णालय सुसज्ज करावे. शाळांच्या इमारती ताब्यात घ्याव्यात. याबाबत चौकशी केल्यास अधिकारी कानावर हात ठेवतात. नेमके काय सुरू आहे. याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. - मुश्‍तकीम डिग्निटी, नगरसेवक, महागठबंधन आघाडी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com