
नाशिक : (येवला) तालुक्याला दोन दिवसांत २०० टन यूरिया आणि बफर स्टॉकमधून १०० टन यूरिया शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, चढ्या दराने विक्री, लिंकिंग व गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेने सुरू केलेले बेमुदत उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.
यूरियासह महत्त्वाची खतेच बाजारातून गायब
तालुक्यात यूरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून खतांची जास्त दराने विक्री होत आहे. त्यातच आता तर यूरियासह महत्त्वाची खतेच बाजारातून गायब झाली असून, शेतकऱ्यांना एखादी गोणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा दूर करून सुरळीत खतविक्री करावी व यूरिया खतांचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदार व अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंत झांबरे, सरचिटणीस किरण चरमळ आदींनी गुरुवार (ता.३०)पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर 'प्रहार'चे उपोषण मागे
पिके असताना शेतकरी खतासाठी वणवण भटकत आहे. नियोजनाअभावी ही वेळ आली असल्याने शेतकऱ्यांची ही गैरसोय तत्काळ दूर करावी, या मागणीसाठी नाइलाजाने उपोषणासारखे हत्यार उपसावे लागत असल्याचे हरिभाऊ महाजन यांनी सांगत ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. सायंकाळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी अधिकारी प्रशांत वास्ते, पोलिस निरीक्षक संदीप कोळी व अनिल भवारी, पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, अन्सार शेख आदींनी मध्यस्थी करत आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.