जिल्ह्यातील २० हजारांवर दुष्काळी विद्यार्थी पास सवलतीविना

जिल्ह्यातील २० हजारांवर दुष्काळी विद्यार्थी पास सवलतीविना

येवला - शासनाने राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला खरा पण त्याची अंमलबजावणी मात्र विस्कळीतपणे होताना दिसतेय. पहिल्या टप्प्यात ज्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेथील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे सुरू झाले आहे. मात्र यानंतर जाहीर झालेल्या २६८ महसुली मंडळांसाठी अद्याप आदेश न काढल्याने या सवलतीपासून विद्यार्थ्यांना वंचित राहून आर्थिक भुर्दड सोसण्याची वेळ येत आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अनेक दुष्काळी भाग वंचित राहिल्याने शासनाने पुन्हा दुसरा आदेश काढून २६८ मंडळात दुष्काळी जाहीर केला. जाहीर दुष्काळी भागात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीही धिम्या गतीने का होईना सुरू झाली आहे. या सरकारने प्रथमच दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटीने मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार पहिल्या यादीतील १५१ तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा आदेश परिवहन महामंडळाने काढला आहे. परंतु २६८ मंडळांसाठी अजून आदेश न निघाल्याने या सवलतीची प्रतीक्षा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात कळवण, नवी बेज, मोकभागी, दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाडसह रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूर व येवल्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव व जळगाव नेऊर या १७ मंडळात दुसऱ्या यादीत दुष्काळ जाहीर झाला आहे. यातील फक्त येवल्याच तब्बल साडेचार हजार विद्यार्थी मोफत पावसाचा लाभ घेऊ शकणार असून इतर तालुक्यांचा विचार करता ही संख्या वीस हजारांपर्यंत आहे. मात्र मोफतच्या एका पत्राअभावी या विद्यार्थ्यांना रोखीने पास काढण्याची वेळ आली आहे.शासनाच्या या दुटप्पी कारभाराचे या निर्णयामुळे हसू देखील होत आहे.

“शाळा महाविद्यालय सुरू होत असल्याने ज्या महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे.तेथील विद्यार्थ्यांना तत्काळ मोफत पास द्यावेत यासाठी मी परिवहन मंत्री मंत्री दिवाकर रावते यांना भेटणार आहे.विद्यार्थ्यांना पैसे भरून पास काढण्याची वेळ येणार नाही यासाठी आग्रह धरून आदेश काढायला लावू.”
-किशोर दराडे,शिक्षक आमदार

“येवला व निफाडमधील सुमारे सात ते आठ हजार विद्यार्थ्यांवर परिवहन महामंडळाकडून अन्याय होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना भेटून तातडीने आदेश काढण्याचा आग्रह धरू.निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.”
-संभाजीराजे पवार,माजी सभापती,येवला

सहा महिने मोफत पास!
सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत दिली जात आहे.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये हि सवलती लागू होऊन शिक्षणासाठी परगावात ‘अप-डाउन’ करणा-या विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत एसटी प्रवास करता येत आहे. याबात एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना सोमवारी महाव्यवस्थापकांनी लेखी निर्देश दिले आहेत.सध्या महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मासिक पासात ६६.६७ टक्के रकमेची सूट दिली जाते. तर ३३.३३ टक्के तिकिट दर वसूल केला जातो. परंतु, आता ही ३३.३३ टक्के रक्कमही आकारण्यात येऊ नये, असे निर्देश विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.ही सवलत १५ नोव्हेंबरपासून तर १५ एप्रिल २०१९ या सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com