गुजरातला वाहून जाणारे 20 टीएमसी पाणी गिरणेत 

गुजरातला वाहून जाणारे 20 टीएमसी पाणी गिरणेत 

जळगाव - पश्‍चिम वाहिन्या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात जाते. ते पाणी "गिरणा'कडे वळविण्याची मागणी होत आहे. त्याअंतर्गत 20 टीएमसी पाणी गिरणा नदीत आणण्यात येणार आहे. याबाबत करार अंतिम टप्प्यात असून, नवीन वर्षाच्या सुरवातीला तो पूर्ण होऊन गिरणा टप्प्यातील नागरिकांना ते भेट ठरणार आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत हा देशातील पहिलाच करार असणार आहे. 

नारपार, औरंगा, अंबिका या पश्‍चिम वाहिन्या नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी गुजरात राज्यात वाहून जाते. या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शासनाने आता त्याबाबत लक्ष देण्यास सुरवात केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरात आता नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्याच अंतर्गत नद्या बारमाही वाहत्या करण्यासाठी प्रयत्न होत असून, त्या अंतर्गत केंद्र व राज्यशासनात अंतर्गत पाण्याचे करारही करण्यात येत आहे. 

राज्य व केंद्रात करार 
देशातील नदीजोड प्रकल्पांतर्गत नदीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी आता महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासनात हा करार होणार आहे. यात वीस टीएमसी पाणी गिरणा नदीत टाकण्यात येणार आहे. चणकापूर येथील धरणात हे पाणी टाकून गिरणा नदीत येणार आहे. याबाबत तापी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, याबाबत प्राथमिक अहवाल आम्ही तयार केला होता. तो केंद्र शासनाकडे पाठविला आहे. राष्ट्रीय जल विकास विभाग (नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी) यांनीही त्याला मंजुरी दिली आहे. मात्र याबाबत अंतिम अहवाल होण्याची प्रतीक्षा आहे. 

राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, की पश्‍चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गिरणा नदीत 20 टीएमसी पाणी टाकण्याचा अहवाल मंजूर झाला आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा करारही करण्यात येणार आहे. 

गिरणा पट्ट्याला फायदा 
गिरणा नदीत येणाऱ्या या पाण्यामुळे नाशिक, जळगाव जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. चणकापूर धरणाच्या वरील नाशिक जिल्ह्यातील गावांना तसेच खाली असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जळगाव या तालुक्‍यांतील गावांना फायदा होणार आहे. 

नदीजोड प्रकल्पांतर्गत पश्‍चिम वाहिनी नद्यांमधील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी पूर्वसंभावना अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. गिरणा नदीत हे पाणी टाकण्याचाही प्रस्ताव आहे. 
- एस. डी. कुळकर्णी, कार्यकारी संचालक,  तापी पाटबंधारे विकास महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com