शेतकरी आणि जवान दोघेही अडचणीत - भुजबळ

शेतकरी आणि जवान दोघेही अडचणीत - भुजबळ

मालेगाव - सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून, देशात न किसान सुखी, न जवान सुखी अशी स्थिती आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केली. 

झाडी (ता. मालेगाव) येथे चणकापूर उजवा रामेश्‍वरमार्गे कुंभार्डे- झाडी कालव्याच्या पाच कोटी ८३ लाख रुपये किमतीच्या विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विक्रम मार्कंड, रघुनाथ परेकर, जळगावचे सरपंच रोडू आहिरे, झाडीचे सरपंच माणिक नेमणार, पुंडलिक होडे, बाळासाहेब दुकळे, दीपक आहिरे, युवक तालुकाध्यक्ष अरुण अहिरे, विनोद चव्हाण, माणिकराव पाटील उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असे केंद्र शासनाने सांगितले होते. मात्र देशात आजही सैनिकांवर हल्ले होत आहेत. पुलवामा येथील हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत असताना पंतप्रधान मात्र न बोलवता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमास हजेरी लावून केक भरवतात, अशी टीका त्यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत आम्ही सरकारसोबत आहोत, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. दहशतवाद्यांनी अशी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये फूट पडणार नाही. आम्ही एकसंध राहू. गेल्या चार वर्षांत युती शासनाने कर्जाचा बोजा साडेपाच लाख कोटी रुपयांवर नेवून ठेवला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांना काहीच मिळाले नाही तर हा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंकज भुजबळ म्हणाले, की झाडी परिसर हिरवागार करण्यासाठी या कालव्याला पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू होते. युती सरकारकडून प्रकल्प प्रलंबित राहिला, यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून पावसाळ्याच्या आत काम पूर्ण होईल. तसेच पुढच्या टप्प्यात झाडी ते नागासाक्‍या हा कालव्याचा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील, डॉ. हिरे, प्रसाद हिरे, विनोद शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

नार-पारचे पाणी मिळवणारच
नार-पारचे पाणी गुजरातला जात आहे. ते पाणी महाराष्ट्रालाच मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. नार-पारचे पाणी मालेगाव-देवळा भागात आणल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून दुष्काळाचा प्रश्‍न सोडविण्याऐवजी डान्स बार सुरू करण्यात सरकार धन्यता मानत असल्याची टीका त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com