पर्यटनवृद्धीच्या संधींना हवे निधीचे टॉनिक

सारंगखेडा - चेतक महोत्सवात रपेटीचा आनंद लुटताना परदेशी पर्यटक.
सारंगखेडा - चेतक महोत्सवात रपेटीचा आनंद लुटताना परदेशी पर्यटक.

जळगाव - परदेशात पर्यटनाला उद्योगाचे रूप आल्याने त्यातून मोठी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. पर्यटन विभागाने त्याच धर्तीवर प्रयत्न असून, सारगंखेडा येथील चेतक महोत्सव त्याचे उत्तम उदाहरण आहे.

राज्यात अशी किमान डझनभर ठिकाणे आणि यात्रा महोत्सवांचे ब्रॅंडिग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद राज्य सरकारने करायला हवी. सरकार त्यादृष्टीने प्रयत्नरत आहे. आगामी काळात वेरूळ येथील बंद पडलेला महोत्सव सुरू करण्यास प्राधान्य असेल, असे पर्यटन विभागाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

राज्य सरकारतर्फे पर्यटनाच्या वृद्धीसाठी ठिकठिकाणच्या यात्रा, महोत्सवांना देश आणि जागतिक पातळीवर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुबई महोत्सवात सारंगखेडा यात्रेचे झालेले ब्रॅंडिग त्याचाच भाग होता. शिवाय स्थानिक स्तरावर या यात्रांकरिता निधीची उभारणी, करमणुकीच्या अत्याधुनिक सोयी पुरवणे, जवळच्या पर्यटनस्थळांचे जाळे करून एकत्रित पॅकेज करता येईल का, याची चाचपणी अशा प्रयत्नांना गती आली आहे. 

रिसॉर्ट उभारणीवर भर
पश्‍चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूर, गगनबावडा, पन्हाळा, जोतिबा डोंगर येथे चार निवास (रिसॉर्ट) बांधलेत. येथे साहित्यिकांशी गप्पा, स्थानिक कलाविष्कार, ग्रामीण पर्यटनासोबत कोल्हापुरी मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. जोतिबा डोंगर येथे ३६ सूटचा रिसॉर्ट आहे. त्याला पर्यटक, भाविकांचा विक्रमी प्रतिसाद आहे. दाजीपूर येथे १३ सूट आणि कॅंटीनची सेवा सुरू होईल. दाजीपूर जंगलापासून जवळच रिसॉर्ट, तर गगनबावड्यात ११ सूट व कॅंटीन सेवा, पन्हाळ्यावर ९ सूटचे रिसॉर्ट होत आहेत.

राज्यातील बंजारा समाजाचे आराध्यदैवत वडांगळी (ता. सिन्नर) येथील सतीमातेची यात्रा, सप्तशृंगगड (जि. नाशिक), माहूरगड (जि. नांदेड), माळेगाव (ता. लोहा), चिमूर (जि. चंद्रपूर) येथील घोडायात्रा, बहिरम यात्रा (जि. अमरावती) आणि सोलापूरच्या सिद्धेश्‍वर यात्रेबाबतही प्रशासनाने मनावर घेतल्यास यात्रेनिमित्ताने त्या त्या भागांच्या संस्कृतिक वैशिष्ट्यांचे सकारात्मक मार्केटिंग करता येऊ शकते. रामटेक (जि. नागपूर) येथे कार्तिकी पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. ‘रामटेक महोत्सवा’चे आयोजन व्हावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करावी. सांस्कृतिक कार्यक्रमासह पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी ‘एमटीडीसी’च्या माध्यामातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

वेरूळ महोत्सवाचे रुतलेले चाक
दख्खनच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, मूल्यांचा जगभर प्रसार करणाऱ्या ‘वेरूळ-अजिंठा महोत्सवा’चे गाडे दहा वर्षांपासून प्रशासकीय नियोजनाअभावी रुतलेले आहे. देशीविदेशी पर्यटकांकडून दरवर्षी या महोत्सवाबाबत विचारणा होते. प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असले तरी महोत्सव काही सुरू होत नाही.

वेरूळ महोत्सवामुळे अनेक उत्साही मंडळी, हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिक जोडले गेलेत. स्थानिक कलाकारांना महोत्सवामुळे जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळाले. पण, काही वर्षांपासून हा महोत्सव भरवण्याबाबत फारसा उत्साह दाखवला जात नाही. . 
- डॉ. दुलारी कुरेशी, तत्कालीन सांस्कृतिक समिती अध्यक्ष, वेरूळ-अजिंठा महोत्सव आयोजन समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com