Dhule News: वृक्षगणनेसाठी वार्षिक 28 लाखांचा ठेका
Dhule News : विकसनशील आणि हद्दवाढ झालेल्या येथील महपालिकेला विलंबाने वृक्षगणनेचा मुहूर्त सापडला आहे. त्यासाठी मुंबईतील कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे. याकामी वर्षाकाठी २८ लाखांचा निधी ठेकेदाराला द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराच्या प्रतिनिधीने आयुक्त दालनात अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरणाच्या समिती सदस्यांपुढे प्रेझेंटेशन सादर केले. (Contract of 28 lakhs per annum for tree census Dhule News)
प्रेझेंटेशननंतर महापालिकेने वृक्षगणनेचा ठेका दिला आहे. शहरातील वृक्षांची संख्या नेमकी किती, त्याबाबत गणना व्हावी, अशी वृक्षप्रेमी आणि वृक्ष समितीच्या सदस्यांची वारंवार मागणी होती. याअनुषंगाने वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षगणनेचा निर्णय घेतला.
मुंबईच्या गोरेगाव येथील सार आयटी रिसोर्सेस या कंपनीने रस दाखविल्यानंतर येथे प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित करण्यात आले. यात वृक्षगणनेची पद्धती सादरीकरणानंतर वृक्ष प्राधिकरण समितीने सार आयटी कंपनीला वृक्षगणनेचा ठेका दिला.
आयुक्तांची भूमिका
मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यांनी सांगितले, की शहरासह हद्दवाढीतील ११ गावांमध्ये वृक्षगणना केली जाईल. यात महिनाभरात किमान २५ हजार झाडांची गणती केली जाणार आहे. त्यासाठी वृक्षाची उंची दहा फुटांपेक्षा जास्त आणि घेर हा दहा सेंटिमीटरपेक्षा जास्त असावा, असा निकष लावण्यात आला आहे.
वर्षभरासाठी २८ लाखांच्या निधीतून ठेका देण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील वृक्षांची संपूर्ण गणती होईल. कामाचे स्वरूप लक्षात घेत वृक्ष गणती अपूर्ण राहिली तर ठेक्याची मुदत वाढविली जाईल.
वृक्ष समितीचे सदस्य नगरसेवक हर्षकुमार रेलन, अमोल मासुळे, राहुल तारगे, रविकिरण पाटकरी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारातील एका मोठ्या झाडाची बेकायदेशीररीत्या कत्तल करण्यात आली होता. याबाबत आयुक्त टेकाळे म्हणाले, की माहिती घेऊन निश्चित कारवाई केली जाईल.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महापालिकेपुढे काही महत्त्वाचे प्रश्न
महापालिका क्षेत्रात दर पाच वर्षांनी वृक्षगणना व्हावी, असा नियम आहे. असे असताना महापालिकेकडून गणना टाळण्यात येत होती. शहरासह हद्दवाढ क्षेत्र झपाट्याने विस्तारत असताना व हिरवळ नष्ट केली जात असताना महापालिकेचे वृक्षगणनेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होते.
शहरात विकासकामांचा जोर वाढला आणि त्यात झाडांचा बळी गेला. याव्यतिरिक्त शहरात अनेक झाडांची अवैधरीत्या कत्तल होते. त्याची परिपूर्ण नोंद महापालिकेकडे नाही. असे असताना आता जीआयएस व जीपीएस पद्धतीने वृक्षगणना होणार आहे का?
वृक्ष अधिनियमातील बदलानुसार हेरिटेज वृक्षांची माहिती व संख्या तसेच इतर बाबींचा समावेश त्यात असेल का? वृक्षगणनेस एक वर्षाचा कालावधी लागणार असून, नंतरची चार वर्षे देखभाल व माहिती अद्ययावत केली जाईल का?
वृक्ष संवर्धन करापोटी जमा रक्कम वृक्ष संबंधित कार्य व वृक्ष जतन यासाठी वापरली जाईल का, अशा अनेक प्रश्नांची प्रशासनाने उकल करण्याची गरज व्यक्त होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.