पाच मिनिटे आले अन्‌ निघून गेले... हे कसले अच्छे दिन?

live
live

मालेगाव : पाच मिनिटे आले, वरवर पहाणी केली, आमच ऐकूनही घेतल नाही....हे कसले अच्छे दिन? अशा प्रतिक्रिया केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर चोंढी गावाच्या शेतमळ्यातच उमटल्या. अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी (ता.२२) नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिरा आले. त्यांनी चोंढी येथे लक्ष्मण किसन सरोदे यांच्या गट नं. २३२/क मधील भुईमुंगाच्या नुकसानीची पहाणी केली. आधीच उशिर झाल्यामुळे वऱ्हाणे व इतर ठिकाणचे पहाणी दौरे गुंडाळून पथक धुळ्याकडे रवाना झाले. उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या कांद्याचे उळे, कोंब फुटलेले मक्याचे कणीस पथकाला दाखवून भरीव मदतीची मागणी केली.

दौऱ्यांकडे लागले सर्वांचेच लक्ष

अवकाळी पावसाने कांदा, मका, बाजरी, कपाशी, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने आजच्या केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याकडे लक्ष लागून होते. केंद्राच्या डॉ. सुभाष चंद्रा व दिना नाथ यांचे पथक अडीच तास उशिराने दुपारी साडेतीनच्या सुमारास चाेंढी येथील लक्ष्मण सरोदे यांच्या शेतात पोहोचले. शेतकरी व महिला तीन तासापासून त्यांची वाट पाहत होते.

प्रश्नांचा सुरु होता भडीमार

अति पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भुईमुंग शेताची त्यांनी पहाणी केली. शेतकऱ्यांनी या ठिकाणी टोपलीत सडलेले कांद्याचे रोप व कोंब आलेला मका आणला होता. हे तुम्ही कोठून आणले. पावसामुळे किती नुकसान झाले? किती काळ पाऊस होता. एवढे प्रश्‍न अधिकाऱ्यांनी विचारले.

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
सविता सरोदे, नंदाबाई ढोणे, गितांजली सरोदे, लक्ष्मण सरोदे, कौतिक पोमनार आदी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. दोन महिने झालेल्या पावसाने पीक वाया गेले. पाण्याने शेत तुडूंब भरले होते. कांद्याचे उळे सडले. मक्याला कोंब फुटले. पंधरा दिवस तर शेत साफ करण्यातच गेले. शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. उशिर झाल्यामुळे पथकाने वऱ्हाणे येथील पाहणी दौरा रद्द केला. येथील शासकीय विश्रामगृहावर जेवणानंतर त्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. पथकाची वाट पाहत वऱ्हाणे येथे शेतकरी थांबले होते.

केवळ औपचारिकता पूर्ण केली

पथक परस्पर निघून गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पथकाने शेतकऱ्यांसाठी वेळ द्यायला हवा होता. अवघ्या पाच मिनिटात पहाणी करुन पथकाने औपचारिकता पूर्ण करण्यात धन्यता मानल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निलेश सागर (नाशिक), प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, जिल्हा कृषी अधिकारी परवळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने रस्त्यालगतच्या शेतांचे नुकसान पाहिले. आतील मुळ नुकसान पाहिलेच नाही. दौऱ्यावर लाखो रुपये खर्च होत असताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. केंद्र शासनाने भरीव मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
...सागर ढोणे,शेतकरी, चोंढी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com