महाजन आले..."खूष' केले...अन्‌ जिंकून गेले! 

महाजन आले..."खूष' केले...अन्‌ जिंकून गेले! 

धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली, आमदारांनी विद्रोह केला, भाजपला नामोहरम करण्यासाठी कुणाच्याही कल्पनेत नसलेली एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांनी सलगी केली. महिनाभरात राजकीय व सामाजिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली. अशात महाजन आले... त्यांनी पाहिलं... त्यांनी "खूष' केलं आणि जिंकून ते निघूनही गेले..! 

धुळ्यात नोव्हेंबर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या घडामोडींमध्ये राजकारण किती, कसे बदलू शकते याचा एक नमुना म्हणून महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. मंत्री महाजन यांच्याकडे भाजपने सोपविलेली धुरा आणि त्याला याच पक्षाचे ज्येष्ठ आमदार अनिल गोटे यांनी केलेला प्रखर विरोध यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली. मंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी आमदार गोटे यांनी समोरच्यांचे शक्‍य तितके चारित्र्यहनन व गुंडगिरीला प्रोत्साहन देणे, इव्हीएम घोटाळा, पैशांचा महापूर या संबंधात सतत आरोप केले. आपल्या विरोधकांना रोखण्यासाठी त्यांनी आरोप, टीकेची एकही संधी सोडली नाही. 

श्रद्धा ढळल्याचेही चित्र 
शहरातही आमदार गोटेंनी आपले हाडाचे कट्टर वैरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह शिवसेनेशी युती केली. गोटे आणि कदमबांडेंसह शिवसेना यांच्यातून विस्तव जाणार नाही, असे राजकीय वैर असताना त्यांच्यात हातमिळवणी होऊ शकते, हीच अभद्र युती धुळेकर मतदारांना धक्का देणारी ठरली. याबाबत विचार करणारा एक वर्ग शहरासह जिल्ह्यात आहे, हे कदाचित ही नेतेमंडळी विसरून गेली असावी. त्यामुळे निकालाने तर कॉंग्रेस आघाडी, शिवसेनेवरील मतदारांची श्रद्धाच ढळल्याचे दाखवून दिले. अनेक वर्षे तत्कालीन नगरपालिका आणि महापालिकेत सत्ता गाजविणारे कदमबांडे यांच्या राष्ट्रवादीला महापालिकेतील 74 जागांपैकी केवळ 8, कॉंग्रेसला 6, शिवसेनेला 1, आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला 1 जागा मिळाली आहे. भाजपला 50, "एमआयएम'ला प्रथमच चार, समाजवादी पक्ष 2, बसप 1 आणि एका अपक्षाला जागा मिळाली आहे. तत्कालीन पालिका व महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला बहुमताने सत्ता देणारी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. निकालानंतर ती महाजन फॉर्म्युल्यामुळे अधिकच गाजू लागली आहे. 

महाजन फॉर्म्युल्याचा बोलबाला 
निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना झाली. मग अनेक इच्छुकांना उकळ्या फुटू लागल्या. सांगली, जामनेर, जळगाव, नाशिकच्या धर्तीवर धुळ्यातही भाजप "खूष' करणार असल्याने पक्ष प्रवेशासाठी रांग लागली. मात्र, महाजन यांनी "जजमेंट' घेत कोण विजयी होऊ शकते, यासंबंधी गणिते मांडत डावपेचांना सुरवात केली. इतर पक्ष आधी उमेदवार उभे करतात, मग त्यांना आणि इतरांना खूष करण्यासाठी मौलिक योग जुळवून आणतात. त्यात अपेक्षित निकाल लागला नाही, की उमेदवाराच्या नावाने ते बोटे मोडताना दिसतात. महाजन फॉर्म्युल्यात "जजमेंट'ने निवडलेल्या उमेदवारांना "तुम्ही प्रभागात हातपाय जोडा, इतर आम्ही सर्व पाहून घेऊ', अशी कार्यशैली दिसते. त्यासाठी जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबईहून आलेल्या प्रचारकांकडे "मॅन टू मॅन' प्रचाराची जबाबदारी सोपविली जाते. ते प्रचारक भाजपसह संबंधित उमेदवाराचा व्यापक प्रचार करतात. त्याचा अनुभव अनेक धुळेकरांनी घेतला. तोही परिणामकारक ठरल्याचे मानले जाते. 

दुपारी चारनंतर निकाल फिरला... 
मतदानासाठी न निघणाऱ्या अनेक मतदारांनी दुपारी चारनंतर गर्दी करत निवडणुकीचा निकालच फिरवून टाकल्याचे मानले जाते. तिथे कुठला फॉर्म्युला यशस्वी ठरला, याचा शोध आता विरोधक घेऊ लागले आहेत. तोपर्यंत महाजन फॉर्म्युल्याचा बोलबाला आहे. महाजन आले, त्यांनी पाहिले, "खूष' केले आणि जिंकून गेले, या पलीकडे फार काही घडले नसावे, असे मत जाणकारही व्यक्त करू लागले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com