धुळे - मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरचा वाढता भार पाहता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. कॅन्सर केअर सेंटर्सची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात अशी सेंटर उभी राहिली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील खानदेश कॅन्सर केअर सेंटरचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. कैलाश शर्मा आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की राज्यातील सर्वांनाच उपचारासाठी मुंबईत येणे आणि राहणे परवडत नाही, म्हणून आता टाटा इन्स्टिट्यूटने वेगवेगळ्या रुग्णालयांना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले आहे. म्हणूनच कॅन्सरवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. या विकेंद्रित सेंटर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान येणार असल्याने रुग्णांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कॅन्सर ग्रीडचे काम सुरू असून, त्यात धुळ्याचा समावेश केला जाईल. टाटाच्याच मदतीने बोन मॅरोची रजिस्ट्रीदेखील सुरू केली आहे. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, कॅन्सरचा खर्चिक इलाज मुख्यमंत्री कक्ष, जनआरोग्य योजना, ट्रस्ट आदींच्या माध्यमातून मोफत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जास्त बोलणाऱ्यांचे काय होते...?
मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. सुभाष भामरे यांच्या वैद्यकीय कारकिर्दीविषयी बोलताना ते शांत आणि खाली मान घालून काम करणारे निष्णात सर्जन आहेत. ते कमी बोलतात अन् जास्त काम करतात. नाही तर जास्त बोलणाऱ्यांचे काय होते, ते तुम्ही पाहतच आहात, असा चिमटा काढला. त्यांच्या बोलण्याचा रोख एकनाथ खडसे आणि आमदार अनिल गोटे यांच्याकडे होता, हे लक्षात येताच श्रोत्यांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला.
|