Dhule News: जिवाभावाच्या फळझाडांसाठी ह्याळीस दांपत्याचा संघर्ष! सापट्या शिवारात हौद, टँकरच्या पाण्यावर झाडे केली हिरवीगार
म्हसदी : वृक्षलागवडीसाठी शासन यंत्रणा नेहमीच प्रयत्नशील राहते. यंदा दुष्काळाचा फटका वृक्षांनाही बसला आहे. भयानक दुष्काळाचे चटके सोसत असताना यंदा शेतात लावलेल्या फळझाडांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदा विहिरींनी तळ गाठल्याने येथील सापट्या शिवारात शेतकरी दांपत्याने हौदाचे पाणी व टँकरने पाणी देत साडेतीनशे फळझाडे जगविली आहेत.
भर पावसाळ्यापासून स्वतःच्या विहिरीला टिपूसभर पाणी नसताना लगतच्या अर्धा किलोमीटरवरील शेतातील हौदाचे पाणी आणत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत उभय दांपत्याने फळझाडांना जीव लावल्याचे हिरवेगार चित्र उभे आहे. (Dhule Struggle of hyalij couple for fruit trees news)
यंदा दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. बागायती शेतात शेतकरी जाण्यासाठी धजावत नसून कोरडवाहू क्षेत्र रुक्ष झाले आहे. येथील टेलर व्यवसाय करणाऱ्या रामराव झिपरू ह्याळीस यांचे सापट्या शिवारात (गट क्रमांक १५४/१) तीन एकर क्षेत्र आहे.
खडकाळ, मुरमाड जमीन असल्याने पारंपरिक पिके या ठिकाणी अपेक्षित येत नसल्याचा श्री. ह्याळीस कुटुंबाला अनुभव आहे. पर्यायी शेती करावी म्हणून त्यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रात आंबा, सीताफळ, पेरू, चिकू आदी सुमारे साडेतीनशे फळझाडे लावली आहेत. यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भयावह चित्र आहे.
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या रामराव ह्याळीस यांना झाडे लावून जगविण्याचा वेगळा छंद आहे. टेलर काम करत असतानाच स्वयंपूर्तीने अंत्यसंस्कारासाठी योगदान देणारे ह्याळीस टेलर स्वतःच्या शेतातील झाडांना अर्धा किलोमीटरवरील दुसऱ्याच्या शेतातील हौदातील पाणी आणत जीवनातील खरा ‘राम’ शोधत असल्याचे चित्र आहे.
झाडे बनली जिवाभावाची
जगात आनंद, समाधान शोधून मिळत नाही असे म्हटले जाते; परंतु रामराव ह्याळीस मात्र शेतातील झाडांमध्ये आनंद, समाधान शोधताना दिसतात. पोटाच्या खळगीसाठी स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक असणारे रामराव टेलर गावात कोणत्याही दुःखदप्रसंगी सहभागी होतात.
स्वयंपूर्तीने अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी स्वतःला झोकून देतात. हे करत असताना वृक्षाविषयीची प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नाही. वेळ मिळेल तेव्हा शेतात फेरफटका मारल्यावर यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना फळझाडांना बसल्याची जाणीव त्यांना बेचैन करत होती. यंदा ऐन पावसाळ्यातही स्वतःच्या विहिरीला पाणी नाही.
मग अशा वेळी जिवाचे रान केलेली फळझाडे जगतील कशी हा प्रश्न आ वासून उभा होता. लगतच्या शेतात पाळीव प्राण्यांसाठी पाण्यासाठी असलेल्या हौदातून पाणी आणत झाडे जगविण्यासाठी आटापिटा केला. गेल्या आठवड्यापासून उन्हाची काहिली अधिकच वाढली आहे. माणूस, मुक्या प्राण्यांपासून शेतातील उभे पिके, झाडे, फळझाडेही व्याकूळ झाली आहेत. (Latest Marathi News)
झाडाला पाणी देताना रामनामाचा गजर
प्रत्येक झाड पावसाळा सुरू होईपर्यंत जगेल कसे यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून इकडून-तिकडून पाणी आणत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. लगतचे शेतकरीही पाणी नेण्यासाठी कधी आडकाठी करत नाहीत. प्रत्येक झाडाला पाणी देताना रामराव ह्याळीस ‘राम’नामाचा उच्चार करतात.
दिलेल्या पाण्यातून ‘प्रभू श्रीराम’ झाडांना ऐन दुष्काळात जगण्याचे बळ देतील हीच भाबडी आशा श्री. ह्याळीस यांना आहे. यंदा तीव्र दुष्काळाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. पाळीव प्राणी जगतील कसे या विवंचनेत पशुपालक, शेतकरी व्याकूळ असताना फळझाडांसाठी व्याकूळ असणाऱ्या गरीब, कष्टाळू शेतकरी दांपत्यांचा संघर्ष मात्र प्रेरणादायी आहे.
यंदा दुष्काळामुळे संसारालाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पाण्याअभावी शेतातच जाऊ नये असे असताना चार वर्षांपूर्वी लावलेल्या फळझाडांची अवस्था पाहून जीव कासावीस होत आहे. अशा वेळी दुसऱ्याच्या शेतातील हौदातील पाणी टँकरने आणून झाडांना देताना वेगळे समाधान झाले.-कोकिळा रामराव ह्याळीस, महिला शेतकरी, म्हसदी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.