अवैध वृक्षतोडीमुळे बिबट्याचा अधिवास संपुष्टात

अवैध वृक्षतोडीमुळे बिबट्याचा अधिवास संपुष्टात

अंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील नांदिन येथील जयपूर शिवारात बिबट्याचा सध्या मुक्तसंचार वाढला असून तरूण शेतकरी विजय नेरकर हा रात्री शेतातील पिकांना पाणी देत असतांना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला असता बचावल्याचे बोलले जात आहे, तसेच शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जायखेडा व नांदिन परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. येथील ग्रामस्थांनी नुकतेच वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे. जयपूर शिवारातील तुकाराम देवरे, जिजाबाई देवरे, लहू देवरे या शेतक-यांच्या पाळीव जाणावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच परिसरातील अनेकांना बिबट्या निदर्शनास पडत असल्याने सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्याचे नागरिक सांगतात.

अवैधरित्या वृक्षतोड
ताहाराबाद व सटाणा वनपरिक्षेत्रात सध्या सर्रासपणे विना परवाना वृक्षतोड सुरू असून यात मोठ्या प्रमाणात फळझाडांचाही समावेश दिसून येत आहे.  वृक्षतोड करणाऱ्यावर काही कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय शक्यच नसल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच डांगसौंदाणे रस्त्यावर वृक्षतोड करणाऱ्या वाहनातून वृक्ष कटाई करणारे यंत्र वनविभागाने जप्त केले होते. फोपीर रस्त्यावर अवैधरित्या लाकूड घेऊन जाणारा ट्रक एका पोलिसाने पकडून वनविभागाच्या स्वाधीन केला होता. तसेच परिसरातील अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही वृक्षतोड करणारी टोळी वाहनात कामत न येणाऱ्या बाभळाची वाहतूक करण्याचा आव आणत आहेत. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.

वृक्षतोडीमुळे जंगली श्वापदांचा आदिवास असलेले जंगल संपुष्टात येऊ लागले असून बिबट ऊस, मका, डाळींबाच्या बागांचा आश्रय घेऊन नागरी वस्तीत वावरताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील हल्ले वाढले आहेत. नांदिन परिसरातील मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी मधूकर नेरकर, डि. डि. शिंदे, किरण महाजन, मनोहर बोरसे, हेमंत शिंदे, प्रल्हाद पंडित, अशोक महाजन, दादाजी आहिरे, खंडू सावळा, अशोक बोरसे, शांताराम पवार आदींनी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com