बळिराजाला प्रोत्साहनासाठी "स्मार्ट शेतकरी' पुरस्कार

फेसर्डी-नंदगाव (ता. जळगाव) - ग्रामपंचायतीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी प्रोत्साहन योजनेचे गावात लावलेले फलक.
फेसर्डी-नंदगाव (ता. जळगाव) - ग्रामपंचायतीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी प्रोत्साहन योजनेचे गावात लावलेले फलक.

नांद्रा (ता. जळगाव) - शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, तर दुसरीकडे त्याला ऐनवेळी आलेली संकटे, दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत अडकत आहे. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढून त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी नंदगाव-फेसर्डी (ता. जळगाव) येथील ग्रामपंचायतीने चांगले पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना "स्मार्ट शेतकरी' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दुग्ध उत्पादनासारख्या जोडधंद्यासाठीही हा पुरस्कार दिला जाणार आहे.

युवा सरपंच भूषण पवार यांनी राज्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर अशी अभिनव स्पर्धा राबविली जात असल्याचा दावा केला आहे.

नंदगाव-फेसर्डी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. शेतीचे उत्पादन घेण्यात चुरस निर्माण व्हावी, हाच या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. रब्बी हंगाम डिसेंबर 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीतील मका, केळी व खरिपातील कापूस या योजनेत समावेशक आहे. यात कमीत कमी क्षेत्रातून जास्त उत्पादन, ठिबक सिंचनातूनच पीक घेतलेले असावे, उत्पादन खर्च कमी केलेला असावा, सेंद्रिय खताचाच वापर केलेला असावा, अशा अटी आहेत. यात प्रत्येक पीकनिहाय प्रथम पारितोषिक 5100 रुपये, दुसरे 3100 तर तिसरे 1100 रुपये असून, ग्रामपंचायतीतर्फे सन्मानचिन्हही देण्यात येणार आहे.

दुग्ध व्यवसायालाही पुरस्कार
शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा म्हणून दुग्ध व्यवसायासाठीही हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यात गावातील युवकांनी या जोडधंद्याकडेही वळावे, हा या मागचा उद्देश असल्याने ही स्पर्धा घेण्यात आली आहे. यात कमीत कमी जनावरांमधून जास्त दूध उत्पादन, फॅट व "एनएसफ'चा उच्चांक आणि कालवडींचे संगोपन केलेले असावे, अशा नियमांच्या अटी आहेत. यात पहिले बक्षीस 5100 रुपये, दुसरे 3100 रुपये, तर तिसरे 1100 रुपये असून, ग्रामपंचायतीतर्फे सन्मानचिन्ह देण्यात येईल.
या सर्व पुरस्कारांचे जानेवारी 2020 मध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून प्रदान करण्यात येतील. योजनेत भाग घेणाऱ्या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आपल्या सरपंचांकडे नाव नोंदणी करावयाची आहे. नाव नोंदविण्यासाठी अंतिम मुदत 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत आहे.

शेतीत उत्पादन होत नसल्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच वडिलोपार्जित शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवकांना शेतीकडे वळविण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्याचा उद्देश आहे.
- भूषण पवार, सरपंच, नंदगाव-फेसर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com