बळीराजाला विश्‍वास देणे गरजेचे - अशोक चव्हाण

ठक्कर डोम - कृषिथॉन २०१८ च्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुवारी उपस्थित माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. शेजारी संजय न्याहारकर, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, साहिल न्याहारकर, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम
ठक्कर डोम - कृषिथॉन २०१८ च्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुवारी उपस्थित माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. शेजारी संजय न्याहारकर, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, साहिल न्याहारकर, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम

नाशिक - राज्यातील शेती अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात असून, शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने शेतकरीहिताला प्राधान्य देत त्यांना दिलासा व विश्‍वास देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे गुरुवारी (ता. २२) केले.

त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोममध्ये गुरुवारपासून कृषिथॉन प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतीपयोगी असे तब्बल तीनशे स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी दुपारी खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, संयोजक व कृषिथॉनचे संचालक संजय न्याहारकर, अश्‍विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, ॲड. जयंत जायभावे व विजय पाटील आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र एकसंध ठेवा 
राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, सिंचनासाठी पाणी हवे आहे. मात्र, पाण्यावरून राज्यातच मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद सुरू झाला आहे. खरेतर पाण्यावरून भांडणे होणार नाही, याकडे लक्ष देत महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे. नाशिक, नगरसह मराठवाड्याला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणीप्रश्‍नावरून जिल्ह्याजिल्ह्यांत भांडणे योग्य नाही.

पाणीप्रश्‍नी राज्याच्या सर्व भागाला न्याय मिळावा, अशी भूमिका खासदार चव्हाण यांनी मांडली. शासनाने शेतीच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतीचे अर्थशास्त्र नीट समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. शेती किफायतशीर का होत नाही, यावर सखोल विचारमंथन होणे गरजेचे आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, अशी अपेक्षा खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली. आमदार फरांदे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाविषयी सविस्तर माहिती दिली. नाशिक भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टर्मिनल मार्केट उभारा
खासदार हेमंत गोडसे म्हणाले, की नाशिक जिल्ह्यात ‘टर्मिनल मार्केट’ होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी २०१० पासून पाठपुरावा केला जात आहे. ते लवकरच होईल, अशी आशा आहे. विविध भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com