केळझर व हरणबारीमधून रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना मिळणार आवर्तन

Farmers in Baglan district will get water supply for rabi crops
Farmers in Baglan district will get water supply for rabi crops

सटाणा : बागलाण तालुक्यात उद्धभवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीतही केळझर व हरणबारी या दोन्ही प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाईवर मात करावी आणि काहीअंशी का होईना रब्बी हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आज शनिवार (ता.२४) रोजी येथे केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील केळझर व हरणबारी लाभक्षेत्रातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार सौ. चव्हाण बोलत होत्या. माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. चौधरी, उपअभियंता एस. पी. पाटील आदी  उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाल्या, कळवण तालुक्यातील चणकापूर व पुनंद प्रकल्पाप्रमाणेच केळझर व हरणबारी या मध्यम प्रकल्पांचे पाणी पिण्याच्या नावाखाली आरक्षित करण्याची प्रक्रिया शासनाच्या विचाराधीन होती. मात्र या दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून घेण्यात यश आले आहे. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणार्‍या बागलाण व मालेगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवाना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गुरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटण्यास मदत होणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

बैठकीत कालवा सल्लागार समिती, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमताने दोन्ही धरणांतील रब्बीच्या आवर्तनाची तारीख निश्चित केली आहे. शेतकर्‍यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करून रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांतर्फे आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी सभापती अशोक सावंत, खेमराज कोर, किरण पाटील, सटाणा बागायतदार पाणी वाटप समितीचे अध्यक्ष झिप्रू सोनवणे, काकाजी झाल्टे, सोमनाथ ब्राम्हणकार, रामदास सोनवणे, नारायण सोनवणे, कैलास सावकार, धर्मा जाधव, बाळासाहेब सूर्यवंशी, रावसाहेब वाघ, विनोद पाटील, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता सूर्यवंशी, आर. आर. निकुंभ, धर्मेंद्र सोनवणे, हरिकांत सूर्यवंशी आदींसह लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

केळझर मध्यम प्रकल्पातून आरमनदीपात्रात २६० दशलक्ष घनफुट पाणी सिंचनासाठी तर ५० दशलक्ष घनफुट पाणी केळझर डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी देण्याचे ठरले. पहिले आवर्तन ता. ५ जानेवारी २०१९ रोजी तर दुसरे आवर्तन १५ फेब्रुवारी २०१९ नंतर शिल्लक पाण्यातून दिले जाणार आहे. हरणबारी मध्यम प्रकल्पातून मोसम नदीपात्रात उपलब्ध पाण्यापैकी ५४६ दशलक्ष घनफुट पाणी ता. २० डिसेंबर २०१८ रोजी तर शिल्लक पाण्यातून डिसेंबर अखेर १०० दशलक्ष घनफुट पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणार आहे. 
- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com