जळगाव (निं.): तालुका व परिसरात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. निमगाव ते उमराणेपर्यंतच्या 25 किलोमीटर रुंदीच्या भू-भागातील शेकडो वर्षांपूर्वींचे बागायती क्षेत्र नष्ट झाले आहे. या भागात अनेक मंत्री व आमदार झाले. मात्र येथील दारिद्य्र दूर झाले नाही. हिरवे रान असलेल्या भागाचे वाळवंटात रूपांतर झाले. पर्यायी व्यवसाय व उद्योग नसल्याने आर्थिक दुष्टचक्रात शेतकरी भरडला असून मराठी नववर्षातील पहिला सण असलेल्या गुढी पाडव्यावर दुष्काळाचे सावट आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरींचे खोलीकरण, कूपनलिका, विहिरी रिचार्ज असे अनेक प्रयोग केले. मात्र पाणीसंकट दूर होत नाही. झाडी धरणात चणकापूरचे पाणी येईल या आशेवर शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या संपल्या. आता कुठेतरी कामाला सुरवात झाली पण झाडीत पाणी पडेल याची शाश्वती नाही. कारण दहिवडपासून वखारीकडे अनेक गेट आहेत. शेतकरी गेट उघडतात, याशिवाय डोंगर उतरणीचा भाग त्यामुळे सिमेंटचे अस्तरीकरण केल्याशिवाय पाहीजे तसे पाणी वाहू शकणार नसल्याने पाणी प्रश्न जैसे थे राहणार आहे.
शेतकऱ्यांनी कृषी कर्ज काढून पोल्ट्रीफार्म, शेततळी, ग्रीनहाऊस, शेडनेट, गोटफार्म पाठोपाठ गोपालन चालू केले. चारा टंचाईमुळे त्याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. महागड्या गाई आणल्यात व कमी किंमतीत विकुन अजून कर्जाच्या खाईत लोटले गेले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लहान टॅंकर एक हजार ते मोठे टॅंकर अडीच ते तीन हजार रुपये आहे. चारा, पाणी, जनावरे व त्यातल्या त्यात शेतकरी बांधवांच्या मुली उपवर झाल्या तरी लग्नासाठी पैसा नाही. गुढीपाडवा एक शुभ मुहूर्ताचा दिवस या दिवशी शेतकरी काहीना, काही नव्या कामाची सुरवात करतात. घर बांधणी, नवीन वाहन खरेदी, विहिरी खोदणे, जमीन सपाटीकरण, पण दुष्काळामुळे सर्व गणित बिघडले. दुष्काळाने शेतकऱ्यांना सणवार विसरण्यास भाग पाडले आहे. यामुळे सण तोंडावर आला असतांना बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. त्यात वाढत्या तापमानाची भर पडली आहे.