सुरत-भुसावळ रेल्वेने प्रवास करताय.. मग सावधान रहा 

robbery-in-trains
robbery-in-trains

अमळनेर ः रेल्वेच्या मुंबई विभागातील ताप्ती सेक्शनवरील सुरत- भुसावळ लोहमार्गावर लुटीचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये सशस्त्र लुटारूंनी दहशत निर्माण करून प्रवाशांची लूट केली आहे. परिणामी प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. अमळनेर रेल्वे स्थानक गुन्हेगारांचा अड्डा बनले असून, याकडे रेल्वे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 
सुरत- भुसावळ लोहमार्गाने रोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. अमळनेर ते जळगाव रोज अप- डाऊन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात अमळनेरहून सुमारे पाचशे तर धरणगावाहून पाचशे प्रवासी रोज ये- जा करीत असतात. मात्र, सुरक्षेअभावी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांकडून लूटमार करण्याचे, महिलांची छेडखानी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासनासह रेल्वे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. लुटारूंचा व टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. 

गुंडांना कुणाचे अभय ? 
अमळनेर रेल्वे स्थानक हे लुटारूंचा अड्डाच बनले आहे. तृतीय पंथीयांच्या टोळ्यांचे म्होरके असलेले गुंड धावत्या रेल्वेमध्ये लूटमार करतात. गेल्या एक वर्षापूर्वी जीआरपी चौकीवर हल्ला करून कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाणही झाली होती. मात्र, अशा गुन्हेगारांवर ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. हे गुन्हेगार पुन्हा जामिनावर सुटून दहशत माजवीत आहेत. गुन्हेगार पोलिसांना हप्ता देत असल्याने दुर्लक्ष होत आहे. या गुंडांना स्थानिक लोकांचेच अभय असल्याचाही आरोप होत आहे. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. 

पोलिस चौकीत दोनच कर्मचारी 
अमळनेर रेल्वे पोलिस चौकीत दोनच कर्मचारी कामावर असतात. रेल्वेतील पोलिसांची पदे गेल्या पाच वर्षांपासून रिक्‍त असून, ही पदे भरणे गरजेचे आहे, असे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. दोनच पोलिसांवर रेल्वे स्थानकाची सुरक्षा असून, परिणामी ते प्रवाशांना काय सुरक्षा देतील हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यातच इतरही कामे त्यांना करावी लागत असल्याने अमळनेर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थाही धोक्यात आहे. 


रेल्वेत अलीकडे चोरी आणि लूटमारीच्या प्रकार कमालीचे वाढले आहेत. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक झालेले आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत. रेल्वेत टीसी प्रमाणे पोलिसांची नियुक्तीही नियमित हवी. 
- एस. डब्ल्यू. पाटील, सचिव, प्रवासी संघटना, धरणगाव. 
.

रेल्वेने माणूस संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे. मात्र, अलीकडे रेल्वेत घडणाऱ्या घटना पाहून प्रवासी भीतीने प्रवास करतात. महिला, लहान मुले यांना लांब पल्याचा प्रवास नकोसा वाटतो. चोरी, लुटमार करणाऱ्यावर कठोर कारवाई आणि प्रत्येक गाडीत शस्त्रधारी पोलिस नेमावा. 
- मिलिंद हिंगोणेकर, रेल्वे प्रवासी, धरणगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com