खानदेशात युवा सेनेचा भगवाच फडकेल 

खानदेशात युवा सेनेचा भगवाच फडकेल 

खानदेशात युवा सेनेचा भगवाच फडकेल 



जळगावः महाविद्यालयीन खुली निवडणुकीसाठी युवा सेना आग्रही होती. त्यासाठी वेळोवेळी युवा सेनेने प्रयत्न केले. अखेर या लढ्याला यश आले. आता महाविद्यालयांत पुन्हा गुलाल उधळला जाणार आहे. सर्वसामान्य नेतृत्व उदयास येण्यासाठी पुन्हा महाविद्यालयीन निवडणुकीपासून सुरवात होणार आहे. देशात घराणेशाही हटविण्यासाठी महाविद्यालयीन निवडणूक महत्त्वाची भूमिका बजावेल. याच धरतीवर "सकाळ'ने युवा सेना जिल्हा युवा अधिकारी शिवराज रावसाहेब पाटील यांची बाजू समजून घेतली. 

प्रश्‍न : महाविद्यालयीन निवडणूक पुन्हा खुल्या पद्धतीने होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? 
श्री. पाटील : लोकशाही समजण्यासाठी महाविद्यालयीन निवडणूक गरजेचीच असते. सर्वसामान्य नेतृत्व उदयास येण्यासाठी व घराणेशाहीला आळा घालण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाला योग्य दिशा देण्यासाठी सक्षम नेतृत्व घडणे महत्त्वाचे आहे. राजकारणात युवावर्ग सहभागी झाला पाहिजे, यासाठी महाविद्यालयीन निवडणूक पहिली पायरी ठरेल. काही अनुचित प्रकार घडल्याने खुली निवडणूक बंद झाली होती; पण सर्व विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीला यश आले आहे. महाविद्यालयात सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

प्रश्‍न ः महाविद्यालयीन निवडणुकीत युवा सेनेचा अजेंडा काय असेल? 
श्री. पाटील ः शिक्षण, आरोग्य, रोजगार, युवतींची सुरक्षितता हा प्रमुख अजेंडा असेल. युवा सेना ही एकमेव संघटना आहे, की जी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थिहिताचे कार्य करते. विद्यार्थ्यांना एक विचारधारा आवश्‍यक असते. युवा सेना ही एक आक्रमक विद्यार्थी संघटना असल्याने युवावर्ग आमच्या पाठीशी आहे. जळगावसह खानदेशात युवा सेना मोठी मुसंडी मारेल. विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वेळोवेळी युवा सेनेने आवाज उठवला आहे. विद्यार्थिहित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विद्यापीठातील अनेक गैरप्रकार रोखण्यासाठी युवा सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केलेली कामे युवकांसमोर घेऊन जाऊ. 

प्रश्‍न ः महाविद्यालयीन निवडणूक आचारसंहितेबाबत तुमची भूमिका? 
श्री. पाटील : आचारसंहिता असणे गरजेचे असते. परंतु काही नियमांचा फेरविचार करायला हवा. विद्यार्थ्यांना संघटनेचे चिन्ह निवडणुकीत वापरण्याची परवानगी द्यायला हवी. तसेच पॅनल करण्यासाठी परवानगी असावी. विद्यार्थी निवडणूक ही विचारधारेला धरून होणार असल्याने उमेदवार कुठल्या संघटनेचा आहे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजायला हवे. त्यासाठी चिन्ह वापरण्यास परवानगी मिळावी. तसेच वयाची अटही 25 वरून 28 करावी. जेणेकरून पीएच. डी. अभ्यासक्रमातील विद्यार्थीही यात सहभागी होतील. पूर्वी बंदी घातलेला काळ आणि आताची परिस्थिती यात फार बदल झालेला आहे. मुळात निवडणुका व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी मोठा संघर्ष केला आहे. महाविद्यालयीन निवडणूक म्हणजे लोकशाही शिक्षणाचाच एक भाग आहे, हे मंडळ बळकट करायचे असेल, तर संघटनांनाही निवडणूक लढण्यास परवानगी हवी. कारण लढण्याचे बाळकडू संघटनेत मिळते. 

प्रश्‍न ः महाविद्यालयीन निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी काही उपाययोजना हव्यात? 
श्री. पाटील : महाविद्यालय प्रशासन तसेच विद्यार्थी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, पोलिस प्रशासन यांनी एकत्रित येऊन यासंदर्भात नियोजन केले पाहिजे. वादग्रस्त विद्यार्थ्यांना प्रत्येक संघटनेने निवडणुकीपासून दूर ठेवायला हवे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून युवकांना दिशा दाखविली पाहिजे. नेतृत्व घडण्याच्या प्रक्रियेस गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जेणेकरून ही खुली निवडणूक नियमित सुरू राहील. कुठल्याही महाविद्यालयात अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी निवडणूक काळात महाविद्यालयाने अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com