खानदेशात आज कानबाई मातेचा उत्सव!

Kanbai-Utsav
Kanbai-Utsav

जळगाव - कानबाई उत्सव आणि खानदेश यातील संबंध अतूट आहेत. महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कानबाई मातेचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. उद्या (१९ ऑगस्ट) दुपारी कानबाई मातेची स्थापना करण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी (२० ऑगस्ट) विसर्जन होईल.

कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते. खानदेशातील ब्राह्मण, वाणी, मराठी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाजबांधव श्रावणातील शुक्‍ल पक्षात कानबाईची पूजा करतात. या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने ‘नवसपूर्ती’ करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात. पूर्वी गावात केवळ एक- दोन ठिकाणी मानाप्रमाणे कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असे. त्यासाठी सर्व समाजांच्या भाऊबंदकीमधील घटक एकत्रित येत. मात्र, काळाच्या ओघात जातीपातींतील गट-तट, भाऊबंदकीतील वादविवाद, एकत्रित कुटुंबपद्धत या संकल्पनांना छेद देत हा उत्सव साजरा केला जात असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे हा उत्सव आता काही कुटुंबे, समाजांपुरताच उरल्याचे दिसते.

कानबाईचे पारंपरिक महत्त्व
कानबाई प्रतिष्ठापनेवेळी पितळी अथवा लाकडी मुखवटा धारण केलेली मूर्ती अथवा श्रीफळाची पूजा-अर्चा करून त्यास ‘कानबाई’ असे संबोधून हिरवे वस्त्र परिधान करून आभूषणांनी सजवून प्रतिष्ठापना केली जात असे. या उत्सवांतर्गत केले जाणारे ‘रोट’ त्या- त्या समाजांतील, भाऊबंदकीतील सदस्य एकत्रित येऊन केले जात असतात. तसेच कानबाई प्रतिष्ठापना अथवा ‘रोट’ करतेवेळी भाऊबंदकीत यंदा कोणाचा मृत्यू तर झालेला नाही ना, तसेच कुटुंबातील स्त्री प्रसूत झालेली नाही ना, हे आवर्जून तपासले जात असते. मात्र, आता या गोष्टींकडे फारसे कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसत नाही.

दुसऱ्या दिवशी होते विसर्जन 
कानबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील लोकांसह परिसरातील आबालवृद्ध एकत्रित येतात. यावेळी रात्रभर स्वरचित गाणी म्हणत, फुगड्या खेळत, थट्टा- मस्करी करीत जागरण केले जात असते. दुसऱ्या दिवशी गावातील लोक अर्धा दिवस कामकाज बंद ठेवून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.

अहिराणी संस्कृतीचे श्रद्धास्थान!
कानबाई अहिराणी संस्कृतीचे श्रद्धास्थान. नवसाला पावणारी देवता. श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी खानदेशात घरोघरी कानबाईची स्थापना होते. हा भाऊबंदकीचा उत्सव असतो. साऱ्या भाऊबंदकीला भावनिक एकतेने बांधून ठेवतो. नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी गायीला गोऱ्हा झाला आणि त्याच दिवशी घरात मुलाचा जन्म झाला, तर कानबाईची स्थापना करतात. दुसरे कारण म्हणजे कानबाईला नवस केल्यानंतर तो पूर्ण झाला तर कानबाईची स्थापना करतात. एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर ती कानबाईला ‘नवस’ करते. दरम्यान, चैत्र-वैशाखातल्या कानबाईसमोर सामूहिक विवाहाची सुधारणावादी दृष्टी आली. आजही अनेक गावांत असे सामुदायिक विवाह होत आहेत. कानबाई ‘नवसाची देवता’ आहे. तिच्यावर अहिराणी भाषकांची नितांत श्रद्धा आहे. श्रावणातील शुक्‍ल पक्षात कानबाईची पूजा करतात. या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने नवसाची परिपूर्ती करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात. कानबाईचा नव भिल्ल समाज वगळता सर्वच जातींमध्ये केला जातो. पूर्वी गावात केवळ एक- दोन ठिकाणी मानाप्रमाणे कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com