केळझर चारीच्या(8) कामास शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता 

केळझर चारीच्या(8) कामास शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता 

सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित केळझर चारी क्रमांक आठच्या कामास अखेर राज्य शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या २६ नोव्हेंबर पासून हे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार असून, लवकरच काम पूर्ण होऊन लाभक्षेत्रातील सर्व गावांचा शेतीसिंचन व पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी काल मंगळवार (ता.३०) रोजी सायंकाळी माहिती दिली.

याबाबत सकाळशी दूरध्वनीवरून बोलताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल व जलसंपदा विभागाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. बैठकीत केळझर चारी क्रमांक आठच्या कामास प्रशासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता दिली. विशेष बाब म्हणजे राज्य शासनाने मंजूर केलेल्या ४ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीतून केळझर चारी क्रमांक आठच्या कान्हेरी नदीवरील जल वाहिन्यांसाठी ८२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. 

बागलाण तालुक्यातील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केळझर चारी क्रमांक आठचे काम मार्गी लावावे यासाठी शेतकऱ्यांनी विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र या आंदोलनांची दखल न घेतल्याने अखेर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपण स्वतः या कामात लक्ष केंद्रित केले. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर पदाचा वापर मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वासाठी केला. गेल्या महिन्यात केळझर चारी क्रमांक आठ साठी दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी २५ लाख असा एकूण ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून गेल्या २६ सप्टेंबर रोजीच चारीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली होती. आज मंत्रालयात झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत चारीच्या कामास  प्रशासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता देत ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम आता युध्दपातळीवर हाती घेतले जाणार आहे. या चारीच्या ० पासून १२ किलोमीटर पर्यंत व त्यापुढील भाक्षी - मूळाणे पर्यंतचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यापुढील चौगाव, कऱ्हे, अजमिर सौंदाणे, सुराणे, देवळाणे, वायगाव येथील सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या वाढीव कालव्यासाठी १४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आपण तीन महिन्यापूर्वीच यशस्वी झालो आहोत. 

केळझर चारी क्रमांक आठच्या डोंगरेज शिवारात ज्या ठिकाणी पाण्याची गळती होते त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात येणार असून कान्हेरी नदीवर चारी जोडण्यासाठी ८२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांचे सहकार्य लाभल्याचेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाल्याने केळझर चारी क्रमांक आठच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

केळझर चारी क्रमांक आठचा प्रश्न गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होता. हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा आघाडी शासनाने मारला होता. सर्वेक्षण करताना एका शेतकऱ्याच्या शेतातून जाणारा हा कालवा प्रत्यक्षात मात्र दुसऱ्याच शेतातून जात असल्याचे चुकीचे सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले होते. मात्र यातून आम्ही मार्ग काढला आणि सातत्याने पाठपुरावा करून गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली. आता युद्ध पातळीवर हे काम हाती घेतले जाणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी सदैव कटिबध्द आहे.                   - डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com