नाशिक - नाशिकच्या आयुर्विमा महामंडळाने यंदा नाशिक विभागातील दोन लाख 67 हजार पॉलिसीधारकांना त्यांच्या मुदत संपलेल्या पॉलिसींचे एक हजार 300 कोटींचे वाटप करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत दोन लाख 21 हजार ग्राहकांना एक हजार 55 कोटींचे वाटप झाले आहे. दहा हजार मृत्युदावे निकाली काढल्याची माहिती आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडपायले म्हणाले, की ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे पैसे वेळेवर मिळावेत, यासाठी आयुर्विमा महामंडळचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. येत्या 28 मार्चला पॉलिसीची मुदत संपत असलेल्या 46 हजार पॉलिसीधारकांचे 245 कोटी रुपये येत्या 15 मार्चपर्यंत देण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. त्यासाठी पॉलिसीधारकांनी आपले बॅंक खाते क्रमांक व मूळ पॉलिसीसह नजीकच्या शाखेत देणे गरजेचे आहे; तसेच यापुढे एलआयसी टपाल विभागावर फारसे अवलंबून न राहता मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून ग्राहकांना वेळीच त्याची माहिती देणार आहे. 1 मार्चपासून आपल्या 65 प्रकारच्या सूचना एलआयसी "एसएमएस'द्वारे देणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बंद पॉलिसीसाठी मोहीम
बऱ्याचदा विविध कारणांनी पॉलिसी मध्येच बंद पडते. ती सुरू करण्यास गेल्यास अनेक अडचणी सांगितल्या जातात. विमा पॉलिसी भरूनही फायदा होत नाही, अशी ग्राहकांची तक्रार असते. मात्र आता 11 फेब्रुवारीपासून 30 मार्चपर्यंत एलआयसीने रिव्हायव्हल कॅम्पेन सुरू केले आहे. या कालावधीत बंद पॉलिसी सुरू करता येणार आहे. ग्राहकाला 20 ते 40 टक्के व्याजामध्ये सूट दिली जाणार आहे.
|