नाशिक - कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात पुन्हा एकदा विजेच्या भारनियमनाचे चित्र आहे. मंगळवारी रात्री राज्यात सुमारे 2 ते अडीच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवाच्या सणासुदीत जी-1 ते जी-3 वर्गवारीतील ग्राहकांना भारनियमन सुरू झाले आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोळसा टंचाईचा विषय ऐरणीवर आला आहे. औष्णिक वीज केंद्राकडे पुरेसा कोळसाच नसल्याने वीजनिर्मिती घटली आहे. कोळशाअभावी राज्यातील वीजनिर्मिती घटली आहे. ऑक्टोबरच्या सुरवातीलाच उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. पीक वाचविण्यासाठी पाण्याची गरज असताना आता भारनियमन सुरू झाल्याने विहिरीत पाणी असूनही ते उचलता येण्यासारखी स्थिती नाही.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात हे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात यंदा अपुरा पाऊस आणि परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आधीच शेती पीक अडचणीत आली. आता कोळशाच्या संकटामुळे पीकपाण्यावर त्याचा मोठा परिणाम होईल.
खुल्या बाजारात विजेचे दर काल 10 रुपये 69 पैसे प्रतियुनिट एवढे विक्रमी पोचले होते. एका बाजूला वीजनिर्मिती घटली, खुल्या बाजारातील विजेचे विक्रमी दर होऊनही पुरेशा प्रमाणात वीजही उपलब्ध नसल्याचे चित्र होते. राज्यात यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने कोयना येथील जलविद्युत प्रकल्पातील ऊर्जा निर्मितीवर मर्यादा आल्याने सध्या त्यामुळे सर्वाधिक वीजगळती असलेल्या जी वर्गवरातील भारनियमन सुरू आहे.
राज्यातील विजेची स्थिती
विजेची मागणी - 19500 मेगावॉट
विजेची उपलब्धता - 16 ते 17000 मेगावॉट
विजेची तूट - 2000 ते 2500 मेगावॉट
रोज लागणारा कोळसा - 43 दशलक्ष मेट्रिक टन
खुल्या बाजारात विजेचे दर ः 10.69 पैसे (प्रतियुनिट)
कंपनीची वीजस्थिती
केंद्रीय प्रकल्प 4590 मेगावॉट
महानिर्मिती 5315 मेगावॉट
गॅस प्रकल्प 267 मेगावॉट
कोयना जलविद्युत 1156 मेगावॉट
अदानी 2557 मेगावॉट
रतन इंडिया 270 मेगावॉट
जेएसडब्लू 283 मेगावॉट
पवन ऊर्जा 177 मेगावॉट
सौर ऊर्जा 528 मेगावॉट
|