जामफळ प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांकडून बंद; प्रकल्पस्थळी ठिय्या

jamfal project
jamfal project

सोनगीर (धुळे) : जामफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील संतप्त शेतकऱ्यांनी, तसेच भारतीय किसान संघाने जामफळ प्रकल्पाचे काम बुधवारी (ता. १०) बंद पाडले. जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत सोंडले शिवारातील बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचा मोबदला मिळत नसल्याने बेमुदत काम बंदचे हत्यार उपसण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तसे पत्रही दिले होते. असे असतानाही प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोचला नाही. काम बंद आंदोलन पुढेही सुरूच राहणार असून, ठेकेदार व शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. 
जामफळ प्रकल्पाचे काम वेगात सुरू असताना प्रकल्पांतर्गत शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जात असली तरी अद्याप ती संपादित करण्यात आली नाही. शेतीची मोजणी झाली आहे. त्या मुळे धड शेती करता येत नाही आणि शेतीचा मोबदलाही मिळत नाही. त्या मुळे शेतकरी अडचणीत आले असून, त्यांचा धीर सुटला आहे. दरम्यान, संपादित शेतीचा एकरी भाव आठ ते सव्वा आठलाख रुपये सोनगीर शिवारातील काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत. शेतीला १५ ते १६ लाख रुपये एकर बाजारभाव असून, त्याप्रमाणे भाव मिळावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांचे उत्पन्न व उदरनिर्वाहाचे साधन तर गेले, आता मिळणाऱ्या मोबदल्यावर उर्वरित आयुष्य असल्याने तो पुरेसा असावा, अशी त्यांची मागणी आहे. 

अशाही आहेत मागण्या
शेतीला बाजारभाव मिळावे, फळझाडे व अन्य झाडांना पुरेसा मोबदला मिळावा, प्रकल्पग्रस्त ४५० शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरीत सामावून घेणे, अकृषक क्षमतेची जमीन असल्याने नवीन कायद्यानुसार चारपट मोबदला मिळावा आदी मागण्या आहेत. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष केदारेश्वर मोरे, आर. के. माळी, ज्ञानेश्वर चौधरी, पराग देशमुख, कपिल परदेशी, गोविंदा वाघ, भागवत परदेशी, धनश्‍याम गुजर, अनिल पाटील, मोहन धनगर, दिलीप वाडीले, मोहनसिंग परदेशी, भटू धनगर, मोहन बडगुजर, लक्ष्मण भिल, विनायक पाचपुते, दगडू धनगर, राजेंद्र महाजन, दिलीप पाटील, पार्वता मोरे, कमलाबाई बैसाणे, रेखा महिरे, भाग्यश्री बैसाणे, सरला माळी, अलका शिंदे, रूपाली बैसाणे, वैशाली माळी आदींनी सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन केले. 

कनिष्ठ अभियंत्यांवर प्रश्‍नांचा भडिमार 
आंदोलनातून कंपनीचे कनिष्ठ अभियंता ढोकचौरे यांनी आंदोलन करणाऱ्या अनिल पाटील, साहेबचंद जैन, श्याम माळी, राजेंद्र महाजन, केदारनाथ कवडीवाले, उत्तम तावडे, संजय बागूल आदी शेतकऱ्यांना प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या भेटीस शिरपूरला नेले. मात्र प्रांताधिकारी बांदल तेथे नव्हते. त्या मुळे संतप्त शेतकऱ्यांनी ढोकचौरेंना धारेवर धरले. प्रशासनाला शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. आता स्वतः ते धरणावर येतील त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे म्हणत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com