मनसेने दिला इशारा..अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याची तयारी

maharashtra navnirman sena
maharashtra navnirman sena

साक्री (धुळे) : तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या साक्री शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा असताना देखील त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या खड्ड्यांच्या त्रासासोबतच वाहतूक कोंडीचा देखील सर्वाना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असताना लोकप्रतिनिधीनी देखील लक्ष देत नाही. अशावेळी यावर 2 जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास निषेध म्हणून अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे. 


याबाबत मनसे जनहित कक्षाचे उपाध्यक्ष धीरज देसले यांनी काढलेल्‍या पत्रात म्हटले आहे, कि “साक्री शहर हे अत्यंत गजबलेले शहर असून, यातून राष्ट्रीय महामार्ग जातो. महाराष्ट्राला गुजरातशी जोडणारा महत्‍त्वाचा मार्ग संपूर्ण तालुक्यातील मुख्य रहदारीचा रस्ता असून इथेच मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालये देखील आहेत. मात्र या मुख्य मार्गावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त झाले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्‍त्वाचा असून दिवसभर मोठी वाहतूक या मार्गाने होते. मात्र खड्यामुळे त्रासासोबतच प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागत आहे. त्यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. यात अनेक जीव गेले तर अनेकांना कायमस्वरूपीच्या गंभीर दुखापती होत आहेत. असे असताना देखील प्रशासन या विषयावर डोळे बंद करून बसले आहे. 

तर खड्ड्यात पिंडदान
रस्त्यालगतच शहरातील सर्व शासकीय कार्यालये असून देखील याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? जनतेने निवडून दिलेले लोकप्रितिनिधी देखील हरवले आहे की काय? हा सर्वसामान्य साक्रीकरांना पडलेला प्रश्न आहे. अनेकदा या गंभीर विषयावर निवेदन देण्यात आले, आंदोलन झाले तरी प्रशासन जनतेच्या जीविताशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष्य देत नसेल; तर याचा अर्थ हे प्रशासन व यातील अधिकारी जिवंतच नाही अथवा हे मेलेल्याच सोंग करत लोणी खाण्यात व्यस्त आहे असं म्हणण्यास हरकत नाही. म्हणून यापुढे शनिवारपर्यंत (2 जानेवारी) रस्त्यावरचे खड्डे भरले गेले नाहीत तर मनसे जनहित कक्षच्यावतीने या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली आंदोलन करून त्यांचे पिंड दान याच खड्यात करण्यात येणार असल्‍याचे धीरज देसले यांनी म्‍हटले आहे.

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा
 
विषयाचा पाठपुरावा
दरम्यान शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा विषय “सकाळ”ने देखील सातत्याने लावून धरलाय. या विषयावर वेळोवेळी सचित्र वृत्त देत प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र सर्वसामन्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात असंवेदनशील बनलेल्या प्रशासनाने अजूनही त्याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट बनून, दररोजचे अपघात वाढत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com