vidhan sabha : जळगावात एज्युकेशन, आयटी हबला प्राधान्य! : अभिषेक पाटील  

vidhan sabha : जळगावात एज्युकेशन, आयटी हबला प्राधान्य! : अभिषेक पाटील  

उच्च शिक्षण घेणे खूप महागले आहे. सामान्यांसाठी ते न परवडणारे आहे. तसेच शिक्षण घेतल्यानंतर मुलांना शहरात नोकरी मिळेल याची हमी नाही. याकरिता पुणे, मुंबईकडे जाण्याचा ओढा असतो. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि नोकरीची संधी जळगावातच मिळावी; याकरिता शहरात एज्युकेशन आणि आयटी हब एमआयडीसीत असलेल्या जागेत लहान उद्योग उभारण्यास अधिक प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यास प्रथम प्राधान्य. यानंतर जळगावकरांच्या प्राथमिक सुविधांच्या समस्या सोडविण्याचा मानस असल्याचे जळगाव शहर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


जळगावातील नागरी सुविधांबाबत आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील म्हणाले, की शहरातील रस्त्यांची अंत्यत वाईट अवस्था झाली आहे. सत्ताधारी आमदार काम केल्याचे सांगतात; पण जळगावकर त्यांना आता जाब विचारताना दिसून येत आहेत. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. ही सभा घेण्यासोबतच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची शहरातील रस्त्यावरून रॅली काढायला हवी होती; म्हणजे त्यांना देखील जळगावचा किती विकास झालाय, हे लक्षात आले असते. 
शहरातील प्रमुख रस्त्यांसह कॉलन्यांमधील अंतर्गत रस्ते देखील खराब झाले असून, ते चांगले करणार. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना- नानी पार्क आणि मुलांना खेळण्यासाठी उद्यान साकारणार हे मनाशी ठरविले आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्राधान्य असणार आहे. 

गाळेधारकांचा प्रश्‍न प्रलंबितच 
गाळेधारकांच्या प्रश्‍नाबाबत श्री. पाटील म्हणाले, केंद्रात, राज्यात व स्थानिक महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. तरीही पाच वर्षांत अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. गाळेधारकांना प्रश्‍न देखील गंभीर होत चालला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देऊन निवडणूक जिंकली. पण पाच वर्षांत कोणत्याही प्रकारे गाळेधारकांच्या बाजूने निर्णय घेतला नाही. आता या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आमदार आणि महापौर यांनी गाळेधारकांना पुन्हा गाजर दाखविण्याचे काम केले. गेले पाच वर्ष झोपले होते का? जनता एवढी मूर्ख नसून तेपण सर्व ओळखून आहेत. यामुळे जनता आता त्यांना निश्‍चितच जागा दाखवेल. 

जनतेचा आपल्यावर विश्‍वास 
श्री. पाटील म्हणाले, की जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुरेश भोळे हे सहज निवडून येतील, असे म्हटले जात असेल; तर ते प्रचार का करताय? आमदारांनी निश्‍चिंत होऊन घरीच थांबावे आणि झोपून राहावे. पण जळगावकर सुज्ञ नागरिक असून, ते या निवडणुकीत त्यांचा जागा दाखवतील. मुळात यापूर्वी शहराचा विकास हा राष्ट्रवादीनेच केला असून, शहराच्या विकासाला 2009 पासून गळती लागली आहे. आता पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्‍वास टाकून संधी दिली आहे. जनता देखील विश्‍वास टाकेल आणि विजयी करेल, असा विश्‍वास आहे. 

विविध योजना राबविणार 
विकासकामांबाबत श्री. पाटील म्हणाले, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांची सत्ता होती. आता पाच वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली मते मागून भाजपचे आमदार झाले. त्यांची कारकीर्द जनतेसमोर आहे. जनतेचा त्यातून अपेक्षाभंग झाला आहे. शहराला या मागासलेपणाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा अजेंडा मी तयार केला आहे. नागरी सुविधा पुरविणे महापालिकेचे काम असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे असते. ते आपण निश्‍चितच करु. शिवाय, शहरात नवीन मोठी विकासकामे, योजना, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उद्योग आणले जातील. यासारख्या अनेक योजनांचे "व्हीजन' आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com