निवडणूक संपली...राजकारण संपलं आता विकास, समाजकारण : आमदार सुरेश भोळे 

suresh bhole coffy sakal
suresh bhole coffy sakal

जळगाव : निवडणूक संपली, राजकारण संपलं.. आता शहराचा विकास आणि समाजकारण हेच आपलं ध्येय असणार आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे जळगाव शहर मतदारसंघातील आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले. सलग दुसऱ्यांदा जळगाव शहरातून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर "सकाळ'ला त्यांनी भेट दिली, त्यावेळी शहराच्या विकासाबाबत "व्हीजन' मांडले. 
"सकाळ'च्या एमआयडीसी कार्यालयात खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य व्यवस्थापक संदीप त्रिपाठी (जाहिरात) उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार भोळे म्हणाले, आपल्याला दुसऱ्यांचा मिळालेला विजय हा आपला नसून खरा जनतेचा विजय आहे. गेल्या पाच वर्षांत आपण जनतेशी ठेवलेला संपर्क तसेच केलेली विकासकामे यामुळे जनतेने आपल्या पुन्हा सेवा करण्याची संधी दिली. 

विरोधकांचेही आभार 
जळगाव विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण निवडणूक झाली. एकमेकावर चिखलफेक झाली नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षाच्या उमेदवारांचेही आभार व्यक्त करतो. निवडणूक संपली, राजकारण संपलं आता आपण विकास आणि समाजकारण करणार आहोत. 

रस्त्याची कामे प्राधान्याने 
जळगाव शहरात आपण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार आहोत, असे सांगून आमदार भोळे म्हणाले, की "अमृत'ची कामे पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम आपण रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणार आहोत. भुयारी गटाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी मिळाली आहे. दुसऱ्या फेजला लवकरच मिळणार आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कामाला विलंब लावणार नाही. रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे निधीचा कोणताही प्रश्‍न आता नाही. 

नवीन एमआयडीसी उभारणार 
जळगावच्या औद्योगिक विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगून ते म्हणाले, नशिराबाद आणि उमाळाच्या मध्यभागात उपलब्ध शासकीय जागेत आपण नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया करून त्याठिकाणी उद्योग उभारणीसाठी जागा उपलब्ध करण्यात येईल. या ठिकाणी मोठे उद्योग आल्यास नागरिकांना रोजगारही उपलब्ध होईल. 

पाच हजार घरांची योजना 
जळगावात बेघरांना घरे देण्यासाठी पाच हजार घरांची योजना अमलात आणण्यात येईल, असे सांगून आमदार भोळे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना जळगावात साकार करण्यात येईल.त्यासाठी जळगाव शहरातील विकासकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. स्लम भागात विकास करून त्या ठिकाणी नागरिकांना घरे देऊन त्या बदल्यात विकासकांना एफएसआय देण्यात येईल. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकडे आपण लक्ष देणार आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com