एक एक झाड उपटत राहिले; पण एक शेंगही नाही सापडली, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

groundnut farm
groundnut farm

म्हसदी (धुळे) : कोरडवाहू पिकांची आर्थिक मदार असलेल्या भुईमूग पिकाने यंदा शेतकऱ्यांचे दिवाळे काढले आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते आणि वाढती मजूरी खर्च करूनही 'तेलही गेले आणि तूपही गेले 'अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. एक एक झाड उपटल्‍यानंतर देखील एक शेंग नसल्‍याने आता नुसता चारा म्‍हणूनच शिल्‍लक राहिले. 
'खेती करे धन का नाश' असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव यंदा बळीराजा घेतो आहे. अति पावसाचा किंवा नैसर्गिक बदलाचा मोठा फटका शेती व्यवसायाला बसल्याचे चित्र आहे. मुबलक पाऊस होऊनही भुईमूगाला चक्क शेंगाच नसल्याचे वास्तव आहे. स्वत: राखून ठेवलेले वा महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी अपेक्षेने दरवर्षाप्रमाणे यंदाही भुईमूगाची पेरणी केली. पाऊसही समाधानकारक असल्याने चांगल्या उत्पन्नाची आस शेतकरी बाळगून होता. कोरडवाहू पिकात भुईमूग हे पैशाचे पीक मानले जाते. किंबहूना कोरडवाहू शेतकऱ्यांची त्याच्यावर आर्थिक मदार असते. पाऊस चांगला होऊन हाती काहीच न येण्याची कारणे शेतकरी सांगत आहेत. वाढही चांगली झाली. पण शेंगा लागण्याच्या कालावधीत निसर्गाच्या वातावरण बदलाचा परिणाम झाल्याचे अनुभवी शेतकरी सांगत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची मेहरनजर असल्याने शेतीला सुगीचे दिवस आल्याने बळीराजा सुखावला असल्याचे चित्र होते. कारण सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसायावर संक्रांत आली होती. सततच्या दमदार पावसामुळे जलस्तर उंचावला आहे. हे शेतकऱ्यांसाठी समाधानाचे चित्र असले तरी निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीचा शेती व्यवसायाला फटका बसल्याचे चित्र आहे. 

भुईमूगांना चक्क शेगांच नाहीत...
साक्री तालुका पावसाळी व उन्हाळी भुईमूग पिकाविषयी अग्रेसर मानला जातो. कोरडवाहू क्षेत्रात सर्वाधिक पेरणी भुईमूगाची होते. सध्या भुईमूग काढणी सुरू आहे. शेंगाच नसल्याने मजूरी देऊन केवळ चारा म्हणून भुईमूग काढला जात आहे. काही शेतकरी जनावरे सोडून देण्याच्या मानसिकतेत आहेत.

उंदराचा उपद्रव...
एकीकडे शेंगाच नसताना आहेत त्यावर उंदीर डल्ला मारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेंगा लागण्याच्या कालावधीतच उंदरानी पसार केल्याचे बोलले जात आहे. वाढती मजूरी शिवाय मजूरांची टंचाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. असे असतानाही ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..., पाठी वरती हात ठेवून फक्त लढ म्हणा' याबळावर शेतीत संघर्ष करत म्हणूनच शेतकऱ्याला 'शेतकरी राजा' म्हटले जाते.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com