केंद्राने आता रोजगाराच्या गाइडलाइन काढाव्यात : नाना पटोले 

nana patole
nana patole

जळगाव : "कोरोना'च्या महामारीतून कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून "लॉकडाउन' करण्यात आले. मात्र, "लॉकडाउन' वाढतच असल्याने लोकांच्या भावनाही तीव्र होत आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन येत आहेत, मात्र "लॉकडाउन'मध्ये रोजगारासंदर्भातील भूमिका आणि त्यातून लोकांना उभे करण्यासाठी समन्वयाची भूमिका याबाबत गाइडलाइन येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारनेही प्रॉपर अंमलबजावणी करून "कोरोना'सारख्या महामारीला जिंकू आणि राज्यातील जनतेला सुरक्षित करू, अशा प्रकारची भूमिका घेण्याची राज्य सरकारची गरज आहे आणि ती भूमिका राज्य सरकार घेत आहे, असे मत विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे व्यक्त केले. 
नागपूर येथून मुंबईला कारने जाताना ते येथे थांबले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की आज काही नियम शिथिल करून मुंबईतील तसेच इतर भागांतील लोकांना गावी जाऊ देण्यात येत आहे. हेच जर "लॉकडाउन'च्या सुरवातीला केले असते तर आज मुंबईत जे रग्ण वाढले ते वाढले नसते. त्यामुळे "लॉकडाउन'च्या सुरवातीस जे निर्णय झाले त्यांच्या परिणामांचा विचार करण्याची आता वेळ नाही. परंतु आता आपली भूमिका अशी आहे, की मुंबईत जी काही गर्दीची ठिकाणे आहेत, स्लम एरिया आहेत त्या भागांतील लोक जर आपापल्या गावी जात असतील तर त्यांना जाण्यासाठी सूट दिली पाहिजे. 

पोलिसांच्या भावना समजून घ्या 
राज्यात पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत ते म्हणाले, की विधानसभाध्यक्ष म्हणून आपले जनतेला आवाहन आहे, की पोलिस दिवस-रात्र जीवावर उदार होऊन "कोरोना'सारख्या महामारीचा सामना करताना लोकांचे रक्षण करीत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. 

राज्य सरकारच्या कामाचे कौतुक 
"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त करून पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, की सरकारने सर्व व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. हॉस्पिटल निर्माण केले आहेत. ज्या भागात "कोरोना'चे रुग्ण आढळले त्याला सुरक्षित करून तेथील लोकांची जेवण तसेच सर्व गोष्टींची व्यवस्था केली जात आहे. "डब्ल्यूएचओ'ने जाहीर केले आहे, की ही महामारी आहे. यातून जीव वाचला पाहिजे. राज्य सरकारही त्याचदृष्टीने प्रयत्न करीत आहे. सरकार स्वतःला झोकून पूर्णपणे काम करीत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही त्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राज्यातील जनताही राज्य सरकारचे कौतुक करताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com