राष्ट्रीय लोकअदालत; सव्वाचार हजार प्रलंबित खटले निकाली 

राष्ट्रीय लोकअदालत; सव्वाचार हजार प्रलंबित खटले निकाली 

जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील कुटुंब न्यायालयात पहिल्या लोकअदालतीत 8 प्रकरणे निकाली निघाली. 
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी मुंबई यांच्या निर्देशानुसार 17 मार्चला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत झाली. संकल्प गीत वाजविण्यात येऊन लोकअदालतीला सुरवात करण्यात आली. 
या लोकअदालतीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना लोकअदालत व त्यामधील तडजोडीचे महत्त्व समजावण्यात आले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप, तसेच इतर न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. पी. बी. चौधरी, तसेच विधिज्ञ व कर्मचारी वर्ग तसेच पक्षकार हजर होते. 
जलद आणि सोप्या पद्धतीने न्याय मिळावा, या संकल्पनेतून पक्षकार त्याचप्रमाणे शासनाचे विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाहन करून या राष्ट्रीय लोकअदालतीत जळगाव जिल्ह्यात प्रकरणे ठेवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हजारोंच्या संख्येने प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात न्यायालयात प्रलंबित असलेली 740 इतकी प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांपैकी 3 हजार 533 इतकी प्रकरणे ही निकाली झाली आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 4 हजार 273 इतकी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाली. 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 एकूण एवढ्या रकमेची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाली. यामुळे दोन्ही पक्षांचा वेळेची व पैशाची बचत झाली. यानिमित्ताने लोकअदालत या संकल्पनेचा अनेक गावागावांमध्ये प्रचार व प्रसार झाल्याने प्रतिसाद लाभला. 

कुटुंब न्यायालयात पहिलीच लोकअदालत 
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शहरातील जुने बी. जे. मार्केट येथे नव्याने स्थापन झालेल्या कौटुंबिक न्यायालयात आज पहिली राष्ट्रीय लोकअदालत झाली. कौटुंबिक वादातील एकूण 34 प्रकरणे पॅनलसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी 8 निकाली निघाली. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी दीपप्रज्वलन करून लोकअदालतीचे उद्‌घाटन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. मेरा मंगल. तदर्थ जिल्हा न्यायाधीश ओ. के. भुतडा, तर पंच म्हणून वकील एस. एस. रुणवाल, श्रीमती श्रद्धा काबरा वकील यांच्या पॅनलची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यासमोर कौटुंबिक वादातील एकूण 34 प्रकरणे ठेवण्यात आली. यात 22 प्रकरणांत पक्षकार हजर होते. त्यापैकी 8 प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालत यशस्वितेसाठी समुपदेशक अर्चना चिकणे, प्रबंधक पी. एन. रोझतकर, स्वीय सहाय्यक व्ही. जी. जोशी, सहअधीक्षक एच. डी. बडगुजर, सहाय्यक अधीक्षक सपकाळे, श्री. भालेराव, श्री. बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com