भय इथले संपत नाही; बिबट्याच्या दहशतीखाली गिरणाकाठ

Chalisgaon
Chalisgaon

पिलखोड(ता. चाळीसगाव): बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. दिवसेंदिवस नरभक्षक बिबट्याची हिंमत वाढत चालली असून, मानवी जिवनावर दबा धरुन बसला आहे. काल(रविवार) दुपारी वरखेडे शिवारात महिलेला ठार केल्याची ही पाचवी घटना आहे. तरी वन विभागाचा 'बिबट्या' शोध सुरुच आहे.

गिरणा परिसरातील ग्रामस्थांना रात्रंदिवस बिबट्याची चिंता पाठ सोडतांना दिसत नाही. शेताबरोबरच गावातही भीतीचे वातावरण कायम आहे. त्यात वन विभाग हल्ले रोखण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत. या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या चार गंभीर घटना घडल्या आहेत. पहिली घटना देशमुखवाडी शिवारातील मुलगा, वरखेडे येथे दोन महिला आणि अलवाडी येथे घोडा ठार केला आहे. 

बिबट्याचा हा खेळ गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे. शेतकरी या जीवघेण्या खेळाला वैतागले आहेत. अर्थिक स्त्रोत असलेल्या शेतातच शेतकऱ्यांना बिबट्यामुळे बंदी झाल्याने आज घडीला अल्पभुदारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोंडअळीने खाल्लेला थोडाफार कापुस शेतात उरला आहे. तो विकुन रब्बी पिकाच्या बियाण्यांना दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी मजुरांची शोधाशोध सुरु आहे. मात्र, बिबट्याच्या धाकाने मजुरही आपल्या जीवावर उदार व्हायला तयार नाहीत. बिबट्यामुळे रोजंदारीने पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वन विभागाचा ड्रोन कॅमेरा निव्वळ गमतीचा भाग झाला असून त्यातून काहीही ठोस घडताना दिसत नाही. ग्रामस्थ वन कर्मचाऱ्यांना माहिती देतात, त्यावेळी त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या हल्ल्यांचे हे सत्र कधी थांबणार? असा सतंप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत. 

नरभक्षक बिबट्याला ठार करावे...
ग्रामस्थांची झोप उडवणाऱ्या बिबट्याला ठार करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारण वन विभागाला अद्यापही बिबट्याला जेरबंद करता आलेले नाही. त्यात होणारे हल्ले थांबता थांबत नाही. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्याला मारा, अशी आर्त हाक मयत कुटुंबियांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

वनमंत्री मुनगंटीवार आजारी...
परिसरात बिबट्याच्य हल्ल्यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधला असता, त्यांच्या स्वीय सहायकांनी मोबाईल उचलला. ते म्हणाले की, साहेब पाच ते सहा दिवसांपासून आजारी असून ते कुणाचेही फोन घेत नसल्याचे त्यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

आतापर्यंत पाच जण ठार....
8 जुलै.......... उंबरखेड..........राहुल चव्हाण
11 सप्टेंबर..........उंबरखेड........अलकाबाई अहिरे
11 नोव्हेंबर..........देशमुखवाडी..........काळु सोनवणे
15 नोव्हेंबर............वरखेडे.............दिपाली जगताप
26 नोव्हेंबर.............वरखेडे.............सुसाबाई माळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com