स्वयंचलित ठिबक यंत्रणेद्वारे दुष्काळातही घेताहेत पिके 

स्वयंचलित ठिबक यंत्रणेची माहिती देताना एस.बी.पाटील
स्वयंचलित ठिबक यंत्रणेची माहिती देताना एस.बी.पाटील

जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील शेतकरी एस. बी. पाटील व डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी चाळीस एकर जमिनीत पाण्याची बचत करून दुष्काळातही चांगल्या प्रकारे पिके घेतल्याचे उदाहरण आहे. 

काही वर्षापूर्वी चांगला पाऊस होत असे. मात्र चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे शेती करणे परवडत नव्हते. त्यात पाण्याची मोठी समस्या होती. यामुळे चाळीस एकर जमिनीतील पिकांना उन्हाळ्यातही पाणी पुरण्यासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले. ऊस, केळी, पपई, कापूस या पिकांना किती पाणी लागते. किती पाण्यावर ते पिके येऊ शकतात याचा अभ्यास केला. त्यानंतर "स्वयंचलित ठिबक यंत्रणा' बसविली. ठरावीक कालावधीनंतर ही यंत्रणा एका ठिकाणचे पाणी बंद करून दुसऱ्या ठिकाणी, नंतर अन्य ठिकाणी सुरू हलविता येते. यामुळे पाण्याच्या थेंब न थेंबाचे नियोजन झाले. 
पाणी वाया जात नसून पाणी देण्यासाठी मजूर लावावा लागत नाही. टंचाईच्या काळात यामुळे केळी, ऊस, पपईचे पीक चांगले आले. या यंत्रणेसाठी केवळ एक लाखाचा खर्च आला आहे. मात्र पाण्याची लाखो लिटरची बचत झाली आहे. 

पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे 
सुरेंद्र चौधरी (अभियंता, पाणी विषयाचे अभ्यासक, भुसावळ) ः शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना आता प्राधान्य दिले पाहिजे. कमी पाण्यावर अधिक पिके घेऊन उत्पादन वाढविता येईल. त्यासाठी पिकांना पाणी देताना ड्रीप इरिगेशन हा मोठा उपाय आहे. सोबतच कोणत्या पिकाला दररोज किती पाणी द्यावे याचे गणित मांडावे. पिकांच्या गरजेनुसारच पाणी द्यावे. पाण्याची समस्या असल्याने पॉली हॉऊसमध्ये पिके घेता येतील. यात पिकांची रचना होरिझंटल किंवा मल्टी लेयर पद्धतीने घेतल्यास एकदा पाणी दिले की ते अनेक पिकांना मिळेल. 


पाणी वाया घालविणे थांबविले पाहिजे 
सागर महाजन ('नीर' पाणी फाउंडेशन अध्यक्ष, जळगाव) ः नागरिकांनी पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करायला हवा. अंगणात पाणी शिंपडणे, वाहने धुणे, गच्ची रात्री गार करण्यासाठी पाणी वाया घालणे टाळले पाहिजे. आर.ओ.चे मशिन असेल तर ते एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी दहालिटर पाणी वाया घालवितो. या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी केला पाहिजे. किंवा पाणी शूध्दीकरणाच्या इतर साधनांचा वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारीच पिके घेतली पाहिजे. नागरिकांनी गच्चीवरील वाया जाणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग केले पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com