"राष्ट्रवादी'तर्फे जिल्ह्यातून संधी कुणाला ? 

ncp flyag
ncp flyag

जळगाव : राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला दोन जागा आहेत. त्यात एका जागेसाठी नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर व "राष्ट्रवादी'चे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. 

"राष्ट्रवादी'च्या वाट्यातील दोन जागांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातून एकाला संधी मिळेल; तर दुसरी जागा नाशिक विभागासाठी आहे. या विभागातून आमदार हेमंत टकले यांची जागा रिक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नाशिक विभागातूनच संधी मिळावी, अशीही पक्षात चर्चा सुरू आहे. नाशिक विभागात येणाऱ्या जळगाव जिल्ह्याला यावेळी संधी मिळावी, अशी पक्षनेतृत्वाकडे मागणी होत आहे. याशिवाय "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांना खानदेशात जळगाव जिल्ह्याने नेहमीच साथ दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावेळी शेतकऱ्यांनी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याची सुरवात जळगावपासूनच करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील माजी आमदार (कै.) मु. ग. पवार, (कै.) प्रल्हादराव पाटील त्यांच्यासोबत होते. एस. कॉंग्रेसची स्थापना केली त्यावेळीही जिल्हा त्यांच्या पाठीशी होता. त्यांनतर कॉंग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा "राष्ट्रवादी कॉंग्रेस' स्थापन केल्यावर जळगाव जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्यासोबत होते.

एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात सहा आमदार व एका खासदारासह क्रमांक एकचा पक्ष होता. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही "राष्ट्रवादी'चा चांगला दबदबा होता. परंतु बदलत्या काळात भाजप आणि शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे "राष्ट्रवादी'ला मोठ्या प्रमाणात फटका बसला. आजच्या स्थितीत जिल्ह्यात "राष्ट्रवादी'चे अमळनेर मतदारसंघातील अनिल भाईदास पाटील एकमेव आमदार आहेत. आमदारकीच्या गणतीत कॉंग्रेस व "राष्ट्रवादी' समसमान असून, दोघांचाही एकच आमदार आहे. मात्र, जिल्ह्यात कॉंग्रेसपेक्षा "राष्ट्रवादी'ची स्थिती चांगली आहे. "राष्ट्रवादी'ला आजही जनाधार चांगला आहे. सहकार क्षेत्रात आज "राष्ट्रवादी'चे वर्चस्व आहे. येत्या काळात जिल्हा बॅंकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे पक्षासाठी बळ देणे गरजेचे आहे. भाजपला तोड देऊन भविष्यात पक्षाला चांगले यश मिळविण्यासाठी जिल्ह्याला विधान परिषदेवर संधी देण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्याबाबत राज्यातील पक्षनेतृत्वाकडून विचारही करण्यात आला होता. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याला बळकटी देण्यासाठी विधान परिषदेवर संधी देण्याबाबत सहमतीही दर्शविली असल्याचे सांगण्यात आले होते. 

पक्षातर्फे विधान परिषदेसाठी आक्रमक नेतृत्व असलेले पारोळा येथील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांवर थेट शाब्दिक हल्ला ते करत असतात. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास पक्षाला बळकटी मिळेल, असेही सांगण्यात येत आहे. याशिवाय माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांचा स्वभाव शांत आहे, मात्र त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. तर विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात त्यांना आमदारकीने अनेकवेळा हुलकावणी दिली आहे. ते शांत अणि संयमी आहेत. त्यामुळे पक्षातर्फे त्यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com