ग्राऊंड रिपोर्ट : धरणे, तलावांमध्ये ठणठणाट; विहिरींनीही गाठला तळ..! 

live photo
live photo

जामनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या चार-पाच वर्षांपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. तालुक्यात धरणे, तलावांची संख्या तीस, पस्तीसच्या वर आहे, तरीही तालुक्यातील ३१ गावांमध्ये ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात सुमारे शंभर ते सव्वाशेवर योजना विविध नावाने मंजूर करण्यात आल्या, त्या पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी बहुतांश गावांना मूळ योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मिळत नाही. या कागदोपत्री पूर्ण झालेल्या योजनांच्या फसगतीचा फटका मात्र जनतेला सहन करावा लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 
तालुक्याच्या या परिस्थितीला जसे काही ठेकेदार वर्ग जबाबदार आहेत. तसेच मंजुरी देणारे आणि कामे पूर्ण झाल्याचा अहवाल देऊन बिलाची इत्थंभूत पूर्तता करून देणारा अधिकारी वर्गही तेवढाच जबाबदार आहे. कुठे जलकुंभ आहे तर पाइपलाइन नाही, तर कुठे सर्व पूर्तता दिसत असली तरी विहीर-तलावांमधून पाणी गावात पोचविण्याची व्यवस्थाच अपूर्ण, असा सर्व बोजवारा दहा-पंधरा वर्षात उडाला आहे. 
 
जलस्रोत असूनही टंचाई कायम 
तालुक्यात धरणे, तलावांची संख्या तीस, पस्तीसच्या वर आहे, तरीही तालुक्यातील ३१ गावांमधे ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये तीघ्रेवडगाव, वाघारी, सार्वेप्रलो, लाखोली, रोटवद, लिहेदिगर, मोरगांव, टाकळी खुर्द, पळासखेडे मिराचे, देवळसगाव, खर्चाणे, सांगवी, पठाडतांडा, करमाड, गोंदेगाव, शंकरपुरा, गणेशनगर, वाकोद, जांभोळ, मालदाभाडी, पळासखेडेकाकर, सारगाव, पहुरकसबे, शेंदुर्णी, मोयगाव, नांद्राप्रलो, लोंढरी बुद्रूक, पाटखेडा, वाडी, वडगावतीघ्रे, गारखेडा, ढालसिंगी, एकुलती बुद्रूक, खुर्द आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

चारा, पाण्यासाठी जनावरांचेही हाल 
त्याचप्रमाणे यंदाच्या दुष्काळाच्या दाहमध्ये जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाळीव जनावरांना बहुतांशवेळा साचलेल्या डबक्यात असलेल्या पाण्याद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईनेही आता डोके वर काढले आहे. शेतातीलच पाणी संपल्याने चाराही पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी पिकवू शकलेले नाहीत. यासर्व परिस्थितीचा सामना पाळीव प्राण्यासह, वन्य प्राण्यांनाही करावा लागत आहे. 

पाण्याचा अवैध उपसा 
वाघूर प्रकल्पाच्या परिसरातील जामनेर शहरासह वीस, पंचवीस गावांना मात्र, या तीव्र पाणीटंचाईतही अजून महिनाभर तरी पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचे टँकर भरले जातात. अल्पपर्जन्यमान, अवैधरीत्या पाण्याचा उपसा यामुळे अनेक तलाव, धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. देवळी-गोगडी, मोतीआई, कांग प्रकल्प आदींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरांनीही तळ गाठला असून, केळी बागा करपू लागल्या आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रता एवढी वाढली आहे, की बहुतांश गावांमध्ये नळ योजनेद्वारा दहा, पंधरा दिवसांनी पाणी सोडले जात असल्याने खासगी टँकर व्यावसायिकांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हजार-पाचशे रुपयांना करावी लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com