कृष्णापुरी धरण पडले कोरडेठाक 

कृष्णापुरी धरण पडले कोरडेठाक 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- चाळीसगाव तालुक्‍यात मागील वर्षात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. अशा परिस्थिती कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) धरणात 18 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परिसरात भविष्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, हे पाणी राखणे आवश्‍यक होते. मात्र, त्यातून सर्रास उपसा होत असल्याने सद्यःस्थितीत शून्य टक्के पाणीसाठा आहे. 

उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढतच आहे. त्यामुळे वरखेडे, लोंढे, वरखेडे तांडा, कृष्णापुरी तांडा, दरा तांडा या भागातील शेतकऱ्यांना आतापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृष्णापुरी धरणाच्या परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे हे धरण मागीलवर्षी 18.53 टक्केच भरले होते. त्यात आता केवळ अर्ध्या टक्‍क्‍यापेक्षाही कमी पाणीसाठा दिसत असला तरी सद्यःस्थितीत या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. 

शिल्लक पाणीसाठा गेला कुठे?  
तीन वर्षांपासून वरखेडे, लोंढे, कृष्णापुरी तांडा, वरखेडे तांडा, दरा तांडा या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे कृष्णापुरी धरण अद्यापही शंभर टक्के भरलेले नाही. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णापुरी धरण 2015 साली 25.74 टक्के भरले होते. त्यानंतर 2016 मध्ये या धरणात शून्य टक्के पाणीसाठा होता. 2017 मध्ये 18.53 टक्के धरण भरले. हा पाणीसाठा वास्तविक आज शिल्लक असायला हवा होता. मात्र, सद्यःस्थितीत धरणात पाणीच राहिलेले नाही. 

पाणी आरक्षित करण्याचे आदेश 
नोव्हेंबरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावला आढावा बैठक झाली होती. यात पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी छोट्या मोठ्या प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश दिले होते. मागीलवर्षी कृष्णापुरी धरणात अठरा टक्के पाणीसाठा झाला. मात्र, या पाण्याची चोरी होत असल्याने धरणात ठणठणाट आहे. या ठिकाणी पाटबंधारे विभागाने वेळोवेळी पाणी चोरी प्रकरणी कारवाया केलेल्या असल्या तरी पाणी चोरी थांबलेली नाही. आजही जे काही पाणी शिल्लक आहे, त्यातून पाण्याची चोरी वीजपंपाद्वारे सुरूच आहे. 

दुर्गंधीयुक्त पाणीसाठा शिल्लक  
कृष्णापुरी धरणात अर्ध्या टक्‍यांपेक्षाही कमी पाणीसाठा सद्यःस्थितीत आहे. हे पाणी दूषित झाले असून त्याचा वास येतो. एखाद्या ग्रामस्थाने साधे हातपाय जरी यात धुतले तरी संपूर्ण अंगाला खाज सुटते. शिवाय पाण्याचाही घाण वास येत असल्याने गुरे देखील हे पाणी पीत नाही. त्यामुळे गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता, सद्यःस्थितीत होत असलेला उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

"कृष्णापुरीत' शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यापूर्वी अनधिकृतरीत्या पाणी उपसा प्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाया देखील केल्या आहेत. पाणी चोरी होत असेल तर कारवाया करू. 
- आकाश शिंदे, कनिष्ठ अभियंता ः लघु पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com