दुधाळ जनावरे चाऱ्यापासून वंचित

residentional photo
residentional photo

पिंपळगाव बसवंत ः अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान होऊन खरीप हंगाम हातातून गेला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी असणारे चारा, वैरणी अस्मानी संकटामध्ये नामशेष झाल्याने दूध उत्पादक शेतकरी हादरले आहेत. निफाड, दिंडोरी तालुक्‍यांतील सुमारे 30 हजार दुधाळ जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे दुधाचा रतिब 30 टक्‍क्‍यांनी घटला आहे. दररोज एक लाख लिटर दूध आता 70 हजार लिटरपर्यंत खाली असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गुजरात दूध कनेक्‍शन कमी झाले आहे. 

द्राक्षांचे आगार म्हणून ओळख असलेल्या निफाड, दिंडोरी तालुक्‍यांत शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत गायी, म्हशींचे तबेले उभारून दूध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत. रोज एक लाख लिटर दुधाचे उत्पादन घेऊन त्यातील 50 हजार लिटर दूध खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गुजरातला रवाना होत होते. गुजरातमुळे दुधाच्या दरात टेकू मिळत होतो. कष्टातून फुलविलेल्या या व्यवसायाला यंदा मात्र लांबलेल्या पावसाने दृष्ट लावली आहे. 

खरीप हंगामातील पिके धुवाधार पावसामुळे नामशेष झाली आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी आपल्या जनावरांच्या वैरणीची वर्षभरासाठी साठवणूक करतात. यामध्ये सोयाबीनचा भुसा, मका पिकाचा चाऱ्याचा समावेश असतो. हे वैरण वर्षभर जनावरांना दिले जाते; पण मका, सोयाबीन पीक उद्‌ध्वस्त झाल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्‍न दूध उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. निफाड व दिंडोरी तालुक्‍यात 30 हजार गायी, म्हशी या दुधाळ जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

सरकी ढेपचे दर 35 रुपये किलो, तर चार हजार रुपये टनापर्यंत उसाच्या बांडीचे असे दुप्पट भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुधाळ जनावरांमुळे फोफावलेला दुग्ध व्यवसायाची मदार खरीप पिकातून येणाऱ्या वैरणीवर होती. आता चारा शिल्लक नसल्याने जनावरांचे पालनपोषण कसे करायचे, ही चिंता आहे. त्यामुळे दूध विक्री हा प्रमुख व्यवसाय असलेल्या काही शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. चाऱ्याचे भीषण संकट पाहता गोधन बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. 

उत्पादन 30 टक्‍क्‍यांनी घटले 
हॉटेल, आइस्क्रिम पार्लरमध्ये दुधाची मोठी मागणी असते. निफाड व दिंडोरी तालुक्‍यांतील पालखेड, कसबे सुकेणे, शिरवाडे, चांदोरी, सायखेडा, मोहाडी, खेडगाव या गावांमध्ये दररोज एक लाख लिटर दूध उत्पादित व्हायचे. वैरणीचे संकट आल्याने आता 30 टक्‍क्‍यांनी घट होऊन उत्पादन 70 हजार लिटरवर आले आहे. गुजरातमध्ये त्यातील 35 हजार लिटर दूध पोचत आहे. 

माझ्या तबेल्यात 100 दुधाळ जनावरे आहेत. चारा पुरेसा मिळत नसल्याने दररोज 750 लिटरऐवजी आता 525 लिटर दूध मिळत आहे. चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने दूध व्यवसाय संकटात आहे. उत्पादन घटले; पण दुधाचे दर वाढलेले नाहीत. 
- भाऊसाहेब लाटे, दुग्धउत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com