युतीकडून दोनदा कॅबिनेटची संधी, पण नाकारली... ः ॲड. के. सी पाडवी 

युतीकडून दोनदा कॅबिनेटची संधी, पण नाकारली... ः ॲड. के. सी पाडवी 

नंदुरबार ः भाजपच्या नेत्यांना सध्या गगन ठेंगणे झाले आहे, जणू सारे काँग्रेसवाले भाजपमध्ये प्रवेशासाठी त्यांच्या दारात उभे आहेत असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. मात्र असे काहीही नाही, नंदुरबार जिल्ह्यातील आमच्यासारख्यांबद्दल अशा अफवा पसरविल्या जात आहेत. पण आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. पक्ष अडचणीच्या काळात सोडून जाणाऱयातील स्वार्थी आम्ही नाही, मला तर युती शासनाच्या काळात (कै)गोपीनाथ मुंडे आणि (कै) बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनही दोनदा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर आली होती, पण मी ती नाकारली, मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच नाही असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार ॲड. के. सी पाडवी यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अनौपचारिक चर्चेप्रसंगी सकाळला सांगितले. त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना हा भाजपचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. श्री. पाडवी म्हणाले,‘राजकारणात कधी नव्हे तो बिकट प्रसंग काँग्रेससमोर असला म्हणून स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱयातले आम्ही नाही. काँग्रेस ही एक विचारधारा आणि परंपरा आहे. काँग्रेसने आदिवासी गोरगरिबांचा विचार करत त्यांच्या विकासासाठी आम्हाला वेळोवेळी संधी दिली आहे. मग आज पडत्या काळात आम्ही सोडून कसे जाणार ? 

मी राजकारणात कोलांटउडी मारायची ठरविले असते तर भाजपचा जिल्ह्यातील पहिला खासदार मी राहिलो असतो, आज त्या तपशिलात मी जाऊ इच्छित नाही. तेव्हाही मी पक्षालाच महत्त्व दिले आणि आजही तिच भूमिका कायम आहे, जिल्हा निर्मितीसाठी पायाभरणी करतानाही पक्षबदलाचा विचार नव्हता. आमच्याबाबत भाजपने पसरविलेल्या अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्‍वास ठेवू नये, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील आपली सत्ता कायम ठेवायची आहे असेही श्री. पाडवी म्हणाले. 
 
समाजाच्या विरोधात कसा जाणार ? 
आदिवासी समाजात भाजपविषयी हा आपला पक्ष नाही ही भावना आहे. भाजपने आदिवासींसाठी गेल्या पाच वर्षात काय केले. प्रस्तावित वनहक्क कायद्याने आदिवासींच्या हक्कावर गदा आणू पाहत आहे. ज्या जनतेने मला अलोट प्रेम दिले, त्या आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जर भाजपविषयी अशी भावना असेल तर त्यांच्याविरोधात मी कसा जाणार? असा प्रश्‍न उपस्थित करीत श्री. पाडवी यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

पक्षबदलाची चर्चा ही भाजपची अफवा 
आपण किंवा आपल्या कुटुंबातील कुणीही कॉंग्रेस सोडणार नाही. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही अफवा आहेत. कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही मात्र माध्यमांना आमच्या प्रवेशाच्या बातम्या पुरविल्या, ही त्यांची चाल आहे. कॉंग्रेस आमच्या नसानसांत आहे, ती कायम राहील.काही जात असतीलही, जाणाऱ्यांनी जावे, त्यामुळे आणखी नव्यांना संधी मिळेल. अफवा पसरवून दिशाभूल करण्याची भाजपची रणनिती आहे, कुणीही त्यावर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांच्या भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, त्यांचा हा निर्णयय दुर्देवी आहे. गावित कुटूंबियांचे कॉंग्रेसमध्ये असलेले वलय आणि प्रतिष्ठेला त्यामुळे नक्कीच धक्का पोचला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com