राज्यपाल म्हणाले...टेस्ट बहुत मिठा है 

bhagatsing koshyari
bhagatsing koshyari

तळोदा : नंदुरबार जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी आदीवासी भागातील ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकल्या. दरम्यान मोलगी येथे असलेल्या भगर प्रोसेसिंग युनिटला दिलेल्या भेटीत त्यांनी शिजवलेली भगर चाखत "टेस्ट बहुत मिठा है' असे उस्फूर्तपणे सांगत महिलांना शाबासकी दिली. 

नंदुरबार जिल्ह्याच्या दोन दिवशीय दौऱ्यात आज पहिल्या दिवशी राज्यापालांनी भगदरी (ता. अक्कलकुवा) येथील ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच आदिवासींच्या उत्थानासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत कसा पोचला आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी विविध लघुउद्योगांची, घरकुलांची पाहणी केली. आदिवासी विकास व पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आदींसह लोकप्रतिनईद उपस्थित होते. 


राज्यपालांनी दिली नवी उमेद 
दुर्गम भागात गेल्याशिवाय तिथल्या जनतेच्या समस्या कशा समजतील, यासाठी मी आपल्या भागात आलो आहे. आपला जिल्हा आकांक्षित म्हणून घोषित आहे. तरीही जिल्ह्याचा विकास आपण सर्व मिळून करू अशी नवी उमेद राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी भगदरी येथे दिली. शासनाने तुमच्यासाठी शौचालयाची व सर्वत्र रस्त्यांची सोय केली आहे तसेच पीएम किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांचा खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. खात्यावर पैसे जमा झालेत का? अशीही त्यांनी थेट विचारले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्‍टरी 8 हजार रुपयांची मदत केली आहे. 


मुक्काम करतो, पण शौचालय हवे 
भगदरी येथील ग्रामस्थांशी संवाद साधतांना राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी आज रात्री मोलगी येथील रेस्ट हाऊसला मुक्काम करण्याऐवजी गावातील एखाद्या नागरिकांचा घरीच मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यासाठी त्यांनी एकच अपेक्षा व्यक्त केली की, त्या घरात शौचालयाची व्यवस्थित सोय असायला हवी. 

मोलगीला तालुक्‍याचा दर्जा द्या 
भगदरी येथे ग्रामस्थांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्याकडे मोलगीला स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी केली. यापूर्वी मध्ये तत्कालिन राज्यपाल सी. विद्यासागर राव पिपळखुटा येथे आले असताना त्यांनाही याबाबत अवगत करण्यात आले होते. त्यांनीही होकार दिला होता अशी आठवण करुन देण्यात आली. लवकरच मोलगीला तालुक्‍याचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

ग्रामस्थांनी मांडली कैफियत 
ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना आपल्या समस्यांबाबत अवगत केले. त्याबाबतचे निवेदन दिले. - सोलर पंप, पाण्याची व बॅंकेची सोय व्हावी अशी ग्रामस्थांनी व्यक्त केली.- दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यांची त्वरित दुरुस्ती करावी. - ग्रामस्थांचा घरात एकच बल्ब, ट्यूबलाईट आहे, वीज तर दिवसातून जेमतेमच येते, तरी बिल भरमसाठ येते.- गावात स्मशानभूमीत नाही तरी स्मशानभूमीची सोय उपलब्ध करुन दयावी. 

शराब पिनेवालो को डॅंडेसे मारो 
संपूर्ण कार्यक्रमात राज्यपालांनी दारू बद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न केला. महिलांना आवाहन करताना दारू पिणार्याना दंडे से मारो असे म्हणत दारू सोडण्याचे आवाहन केले. जर दारू पिणारे कोणीही नसेल तर मी पण रात्री होळी नृत्य करेल आणि होळी मध्येही येण्याच्या प्रयत्न करेल असेही राज्यपालांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com