वणी गडाची प्लॅस्टीक मुक्तीकडे वाटचाल सुरु

Wani
Wani

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडाने (वणी गड) प्लॅस्टीक मुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. 'प्लॅस्टीक मुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तश्रृंगी गड' अभियान राबविण्याकामी सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांनी संयुक्तरीत्या खाजगी ठेकेदाराची नियुक्ती करीत आज पासून गडावर अभियानास शुभारंभ करण्यात आला आहे.

सप्तश्रृंगी गडावर वाढत्या प्लॅस्टीक कचरा व अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी गांभीर्याने दखल घेत मागील चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर प्लॅस्टीक बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, कळवणचे तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासन, सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत, सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्यावतीने वेळोवेळी संयुक्त स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. या काळात सप्तश्रृंगी गडावरील प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्या काही व्यवसायीकांवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईही केली होती. यानंतर जवळपास सर्वच व्यवसायीकांनी प्रसाद व पुजेचे साहित्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर सुरु करुन 'प्लॅस्टीक मुक्ती' अभियानास प्रतिसाद दिला. मात्र गडावर येणाऱ्या भाविक व ग्रामस्थांकडून प्लॅस्टिक वापर काही प्रमाणात होतच होती. 

मागील महिन्यात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे वनविभागाच्या विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी गडावर आले असता त्यांना गडावर काही ठिकाणी अस्वच्छता व प्लॅस्टीक कचरा निदर्शनास आल्यानंतर स्थानिक प्रशासकीय यत्रंना, ग्रामपंचायत, सप्तश्रृंगी ट्रस्ट यांची याबाबत कान उघडणीकरीत करीत गडावर प्लॅस्टीक मुक्ती व स्वच्छता राखण्याकामी ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वतंत्र स्वच्छता पथकाची नेमणूक करण्याची सुचना केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी  अमन मित्तल, तहसिलदार कैलास चावडे व गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्या मार्गदनाखाली ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट यांनी 'प्लॅस्टीक मुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तश्रृंगी गड' या संकल्पनेतर्गंत मे. अस्तित्व मल्टीपर्पज प्रा. लि. नाशिक या खाजगी कंपनीस गडावरील प्लॅस्टीक मुक्ती व गडावरीस स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. 

सदर कंपनी बरोबर ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी ट्रस्ट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित नुकताच संयुक्त सांमजस्य करार झाला असून त्यानूसार ३ लाख ५० हजार प्रतीमहा याप्रमाणे दर आकारण्यात आला आहे. या स्वच्छता पथकात ३६ स्वच्छता कर्मचारी व ४ पर्यवेक्षकांचा समावेश असून या पथकात ग्रामपंचायतीचे १५ व ट्रस्टचे १० स्वच्छता कर्मचारी वर्ग करण्यात आले आहे. सदरचा ठेका प्रायोगिक तत्वावर काही अटी शर्तीच आधीन राहून तीन महिन्याच्या कालावधीसाठी (३० एप्रिल २०१८ अखेर) देण्यात आला असून (ता. २) पासून स्वच्छता अभियानास सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव यांनी पहिल्या पायरीवर श्रीफळ वाढवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गिरीधर गवळी, ललीता व्हरगळ, गणेश बर्डे, जगन बर्डे, मेघा बर्डे, जयश्री गायकवाड, अहिल्या बर्डे सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, शांताराम गवळी, धनेश गायकवाड, तुषार बर्डे, निलेश कदम आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com