पहिल्याच पावसात गळतीमुळे बंधारे निरुपयोगी; कोट्यवधींचा निधी पाण्यात 

पहिल्याच पावसात गळतीमुळे बंधारे निरुपयोगी; कोट्यवधींचा निधी पाण्यात 
Updated on

शहादा : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधलेल्या अनेक बंधाऱ्यांत पाण्याचा टिपूसही नाही. सुमार दर्जाच्या साहित्याचा वापर, जागेचे अयोग्य नियोजन आदींसह विविध कारणांमुळे बंधाऱ्यातील पाणी पावसाळ्यात डोळ्यांदेखत वाहून जाते. परिणामी पाणी अडविण्यासाठी बांधलेले बंधारे निरुपयोगी ठरत असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च मात्र पाण्यासोबतच वाहून जात आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधित कामांच्या चौकशीची मागणी परिसरातून होत आहे. 

शहादा तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च जलयुक्त शिवार अभियान, तसेच तत्सम शासकीय योजनांतून लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, स्थानिक स्तर आदी विभागांमार्फत कोल्हापूर बंधारे, सिमेंट बांध बांधले आहेत. बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर पहिल्याच पावसात बंधाऱ्यांना गळती लागल्याने त्यात पाण्याचा टिपूसही शिल्लक राहत नसल्याने बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. निकृष्ट कामामुळे बंधाऱ्यात पाणी साचत नसून बंधाऱ्याच्या भिंतीला पायापासूनच गळती लागून बंधाऱ्यात साठलेले पाणी वाहून जाते. निकृष्ट काम करून मलिदा लाटणाऱ्या या ठेकेदारांच्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षण करणाऱ्या चाणाक्ष अधिकाऱ्यांना निकृष्ट साहित्य दिसले का नाही, असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. सुमार दर्जाबाबत ठेकेदारांना नेमके अभय कोणाचे, शासकीय अधिकारी की लोकप्रतिनिधी, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी तालुक्यातील खापरखेडा परिसराला रविवारी भेट दिली. त्या वेळी तेथील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामाबद्दल तक्रारींचा पाढा वाचत परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर आमदार गावित संतापले. त्यांनी संबंधित कामांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनाही हायसे वाटले; परंतु खरोखर चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाल्यास निदान यापुढे तरी शासकीय कामांचा दर्जा चांगला राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

आवर्जून वाचा- स्पेलिंगमधील चुकीने लेवा समाजातील विद्यार्थी राहतात वंचित 


विरोधाभास का? 
दरम्‍यान, तालुक्यासह जिल्ह्यात काही खासगी संस्था, नाम फाउंडेशन यांसारख्या संस्थांनी जलसंधारणात मोठे काम करून पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले आहेत. त्यात पाणी साठवून बंधारे तुडुंब आहेत; परंतु शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा टिपूसही नाही. यामुळे नेमका असा विरोधाभास का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com