जिल्ह्यातील कमी मतदानाचा फायदा कुणाला? 

जिल्ह्यातील कमी मतदानाचा फायदा कुणाला? 

जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सरासरी 58 ते 60 टक्के मतदान झाले आहे. कमी झालेल्या या मतदानामुळे युतीला सर्व जागा मिळणार की आघाडीच्या जागा वाढणार, याबाबत आता उत्सुकता आहे. 
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघात युती व आघाडीच्या उमेदवारांत जोरदार टक्कर आहे. तर काही मतदारसंघात भाजप व शिवसेनेने बंडखोरी केल्यामुळे त्या ठिकाणी अधिक चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजप व शिवसेनेत जोरदार "इनकमिंग' झाल्यामुळे युतीची जोरदार हवा निर्माण झाली होती. त्यामुळे आघाडी त्यांच्यासमोर अत्यंत कमकुवत ठरेल, असे चित्र दिसत होते. परंतु, प्रकारानंतर हळूहळू वातावरण बदलल्याचे दिसून आले. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यभरात झंझावाती प्रचार केल्यामुळे विरोधी पक्षाच्या बाजूने अधिक वातावरण निर्मिती झाली. मात्र, दुसरीकडे शिवसेना, भाजप युतीतर्फेही पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रचारात महाराष्ट्र पिंजून काढला. युती व आघाडीच्या नेत्यांच्या जिल्ह्यातही सभा झाल्या तर युतीतर्फे भाजपनेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे युतीची ताकद निर्माण झाली. 
प्रचारामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघात युती व आघाडीची अटीतटी असतानाच प्रत्यक्ष मतदानात मात्र जनतेचा उत्साह कमी दिसून आला. जिल्ह्यात अकरा मतदारसंघात फारसे उत्साहवर्धक चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात मतदानाचा आकडा जेमतेम 65 टक्‍क्‍यापर्यंत जाऊ शकला आहे. त्याचा फायदा कुणाला होणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात गेल्यावेळी युतीला तब्बल 9 जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी पक्षाला केवळ एरंडोल येथील जागा मिळाली होती. अमळनेर येथील जागा अपक्षाला मिळाली होती. कमी मतदानाचा फायदा युतीला होऊन सर्व अकरा जागा मिळवून युती विक्रम करणार की, गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आपले बळ वाढविणार, याकडेच आता लक्ष आहे. 

गुरुवारी मतमोजणी 
जिल्ह्यातील एरंडोल, अमळनेर, चोपडा, रावेर, पाचोरा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या मतदारसंघात चुरस असल्याचे सांगितले जात आहे. झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघात काही उलटफेर होतील काय? याचीच आता उत्सुकता असून, गुरुवारी (ता.24) मतमोजणीत चित्र स्पष्ट होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com