चांदवड (जि. नाशिक) - राज्य सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. 11) सकाळी दहा वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "रस्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी दिली.
शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये फडणवीस सरकारच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी माजी खासदार समीर भुजबळ व जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता महामार्ग चौफुलीवर आंदोलन करण्यात येणार आहे.
|