Nandurbar News : नंदुरबार जिल्हा झाल्यापासून २५ वर्षांत नंदुरबार शहराचा विकास व भौगोलिकदृष्ट्या वाढ झपाट्याने झाली व होत आहे. त्या बाबतीत नंदुरबारकरांनी व्हिजन ५० वर्षे, म्हणजे पुढील ५० वर्षांत नंदुरबार कसे असेल याकरिता जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी येथील ज्येष्ठ अभियंता संजय देसले यांनी रिंग रोडचा मॅपही तयार करून वेळोवेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनापुढे मांडला आहे. (Nandurbar Ring Road to avoid menace of accidents)
मात्र त्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळच नाही, अशा उद्विग्न भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना. शहरातील अपघात थांबविण्यासाठी रिंग रोडच्या बाबतीत जिल्ह्यातील नेत्यांकडून तसेच उमेदवारांकडून जनतेला विश्वास व दिलासा मिळेल का. असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नंदुरबार शहरातून जाणारे प्रमुख महामार्ग बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हायवे ते सुरत-नागपूर हायवे यांना जोडणारा महत्त्वाचा शेवाळी-नेत्रंग महामार्ग तसेच विसरवाडी-खेतिया मध्य प्रदेशकडे जाणारा असे दोन महत्त्वाचे महामार्ग याशिवाय धानोरा ते धरणगाव नवीन महामार्ग नंदुरबार शहरातूनच डायव्हर्शन रोडवरूनच जाणार आहे.
आता वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवीन महामार्ग रस्ते बनविण्याचा आराखडा बनवत असताना शहराच्या वाढत्या वाहतुकीवर त्याचा परिणाम काय होईल याचा विचारच कुणी करताना दिसत नाही. शिवाय समस्यांवर मार्ग काढून निराकरण करण्याचा प्रयत्नही कुणी करत नाही. जनतेलाही वाहतुकीला रस्ते पाहिजेत आणि नेत्यांनाही रस्ते झालेच पाहिजेत, असे वाटत असले तरी वाहतुकीचा पुढील धोका ओळखून नेते त्यावर मंथन करायला तयार नाहीत. (latest marathi news)
फक्त आम्ही मंजूर केला म्हणून क्रेडिट घ्यायला तयार? सदोष रस्त्यांमुळे व वाहतुकीमुळे अपघात होणे, मृत्युमुखी पडणे रोजचेच झालेय, त्यावर कोणीही काही बोलायला तयार नाही. शिवाय रस्त्यांची आखणी करणारे बांधकाम खाते वाहतूक व्यवस्था सुरळीतपुण चालेल व शहराच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही अशा रिंग रोड बनविण्याच्या बाबतीत सुस्त पडलेय.
अपघातांची मालिका
वाहतुकीचा ताण शहरातील वाहतुकीवरील पडणार आणि अजून अपघातांच्या समस्या वाढणार. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे जिल्हाभरातील लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतुकीच्या वर्दळीने शहराला आताचा डायव्हर्शन रोड अपूर्ण पडायला लागल्याने तसेच अवजड वाहनांची वर्दळ व त्यात बेदरकारपणे चालणाऱ्या वाहनांमुळे सतत अपघातांची मालिका सुरू आहे.
मागेच दोन अपघात होऊन एक तरुणी व एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पालकांनाही काळजी वाटायला लागली, तसेच जनतेच्या मनात अपघात मालिकांमुळे रोष निर्माण झालाय.
वाहतुकीचा प्रश्न सुटणार
हे सर्व बघता नंदुरबार शहराला आता नवीन रिंग रोडची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अवजड वाहतूक शहराबाहेरून रिंग रोडच्या माध्यमातून झाल्यास त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होणार नाही. शिवाय शहरात होणाऱ्या अपघातांमुळे जीवित हानीही होणार नाही. अनेक वर्षांपासूनची सुज्ञ नागरिकांची ही मागणी आहे. याबाबतीत नंदुरबार येथील प्रसिद्ध सल्लागार अभियंता संजय देसले वारंवार पाठपुरावा करत असतात.
"वाढत्या वसाहतींसोबतच वाहनांची वर्दळही वाढली आहे. अवजड वाहने भरधाव शहरातील रस्त्याने जातात. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. त्यासाठी शहर विकासाचे ५० वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नंदुरबार शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी रिंग रोडचा नकाशा आपण तयार करून त्याचे फायदे प्रशासन-लोकप्रतिनिधींसमोर मांडले आहेत. मात्र काहीही हालचाली झाल्या नाहीत. निदान लोकसभेचा निवडणुकीत तरी हा मुद्दा आठवावा, जनतेला आश्वासन मिळावे." -संजय देसले, अभियंता, नंदुरबार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.