नाशिक - नगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी खून खटल्यातील न्यायालयाने खून आणि कटात दोषी ठरविलेल्या सहाही आरोपींच्या शिक्षेवर आता शनिवारी (ता.20) निर्णय होणार आहे. आज आरोपींच्या वकिलांनी कमी शिक्षा द्यावी, अशी तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यावर युक्तिवाद केले.
या प्रकरणातील सात आरोपींनी प्रेमप्रकरणातून सचिन सोहनलाल घारू, संदीप राज धनवार, राहुल कंडारे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप होता. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन 15 जानेवारीला न्यायालयाने सहा आरोपींना खून व कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले. त्यांच्या शिक्षेविषयी आज दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
|