सुकाणू समितीचा एल्गार, पुण्यात 23 ला समारोप
नाशिक - शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात सुकाणू समिती राज्यव्यापी जनजागरण यात्रा काढणार आहे. उद्या (ता. 10) नाशिकला एल्गार सभा घेऊन जनजागरण यात्रा सुरू होईल.
नाशिकहून उद्यापासून सुरू होणारी जनजागरण यात्रा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून जाणार असून, पुण्यात 23 जुलैला यात्रेचा समारोप होणार आहे. सुकाणू समितीत सामील सर्व प्रमुख संघटना जनजागरण यात्रेत सहभागी होतील. राज्याचा दौरा करताना प्रमुख 14 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. यात्रेतून जनजागरण करताना संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशा या जनजागरण यात्रेतून ठरविली जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावल्या. कर्जमाफीसाठी दीड लाखाची मर्यादा, 30 जून 2017 ची अट घातली, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. पॉलिहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालनासाठी कर्ज या माफीतून वगळण्यात आले. जनजागरण यात्रेत शेतकऱ्यांच्या मनातील भावना समजून घेत पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. यात्रेच्या निमित्ताने सर्व संघटनांनी एकत्र येऊन जाहीर सभा घेण्यात येईल. सुकाणू समितीत सामील झालेल्या सर्व संघटनांनी यात्रेसाठी स्वतंत्र प्रचार रथांचे नियोजन केले आहे.
|